Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होते. येथे तर कोणताच सुपरिणाम साधत नाही. कारण ही दुक्कल मुळात सत्प्रवृत्त, विद्वान वाटतच नाही. शिवाय दैत्यसंप्रदायात दारूला जे धार्मिक पावित्र्याचे अधिष्ठान आहे, त्याचेही परिणामकारक प्रस्थापन होत नाही. तसा प्रयत्न प्रारंभीच्या प्रवेशात होतो. सगळ्यात न पटणारी गोष्ट म्हणजे शुक्राचार्याचे दारुविषयी झालेले झटपट हृदयपरिवर्तन। शुक्राचार्य हा दारूडा, व्यसनी होता काय? तो स्वतःला कवी म्हणवून घेणारा, सहृदय म्हणवून घेणारा. दारू ही आदिशक्तीचे, देवीचे तीर्थ म्हणून पवित्र मानणारा. शिवाय दारुतून कचाची राख गेल्याने अनर्थ झाला, ही गोष्ट खरी असली, तर वृषपर्व्याचा उतावळेपणाही त्याला तेवढाच जबाबदार आहे. दारुच्या दुष्परिणामावर प्रारंभी कच आणि शेवटी शुक्राचार्य यांची बरीच मोठमोठी भाषणे आहेत. त्यातून काही तात्त्विक भूमिका मांडण्याचाही प्रयत्न केला आहे. 'बृहस्पती म्हणजे नेहमी सावधान असलेला आत्मा. त्याचा मुलगा कच बेसावध करणारी दारु प्या, असा उपदेश कसा करील ? हा त्याचा युक्तिवाद आहे; तर तपस्वी जनांना 'सिद्धीमुळे जो उन्माद अनुभवता येतो, तो सामान्यांना मद्यामुळे विनासायास येतो, ' हा शुक्राचार्याचा युक्तिवाद आहे. दारूविषयक चर्चेने दोन्ही पातळ्यांवर नाटकाचा बराच भाग व्यापला असूनही दारूचे दुष्परिणाम गंभीरपणे मनावर ठसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तात्पर्य, 'विद्याहरणात कच- देवयानी प्रेमप्रकरण हे केवळ साधन म्हणून वापरले आहे. ते केवळ राजकीय डावाचे साधन आहे. हे प्रेम उभयपक्षी ' आज्ञेतून ' सुरू झालेले. पुढे देवयानी खरी प्रेयसी म्हणून स्थापित होऊ लागते; परंतु शुक्राचार्याने तिच्या प्रेमाचा (?) साधन म्हणूनच उपयोग करून घेतलेला दिसतो. कर्तव्य की प्रेम हा संघर्षच त्याच्या मनात नाही. कारण कर्तव्याशी त्याची बांधीलकी आद्य आहे हे नक्कीच आहे. त्यामुळे ही कच - देवयानीच्या प्रेमाची शोकांतिका होत नाही. शुक्राचार्याचीही शोकांतिका होत नाही. एका तरूण मुलीच्या प्रामाणिक भावनांशी खेळलेल्या जीवघेण्या राजकीय डावाची आणि त्यातून निर्माण झालेल्या भावभंगाची एक करूण कहाणी होते. 'विद्याहरणा'तील पदांविषयी - खाडिलकरांच्या नाटकातील संगीत हे सहसा अपरिहार्यपणे आलेले नसते, तसे यातही नाही. सर्व पदे गाळून टाकली तरी या नाटकाच्या आस्वादाला कोणताही बाध येत नाही. शोकांत असल्याने हे नाटक संगीतानुकूल नाहीं, असे म्हटले जाते; पण त्यात फारसा अर्थ नाही. बाकी जाहीर व्याख्याने दिल्याप्रमाणे कच, शुक्राचार्य आणि प्रेमाचे तत्त्वज्ञान सांगताना देवयानी ही सर्वच पात्रे बोलतात. प्रचारी पुनरुक्तीही सर्वांच्याच नाटककार खाडिलकर ९७ खाडिलकर - ४