________________
यांच्याशी सर्वंकष चर्चा- विचार विनिमय करून आणखी १३ नावे निश्चित केली. या सगळ्यात चरित्रलेखकांची मुळातील संकल्पित ६० ही संख्या ६१ वर गेली. हाती घेतलेल्या या प्रकल्पाचे आकारमान, हाताशी उपलब्ध असलेला वेळ व मनुष्यबळ आणि मुख्य म्हणजे या प्रकल्पाची वित्तीय बाजू ध्यानात घेता, चरित्र नायकांची संख्या ६१ पेक्षा अधिक न वाढवण्याचा निर्णय घेतल्याने जीवनाच्या काही अंगांतील लोकोत्तर व्यक्तींचा अंतर्भाव त्यात करता आलेला नाही, याची आम्हांस पूर्ण जाणीव आहे. समाजकारण, इतिहाससंशोधन, समाजसेवा, पत्रकारिता, साहित्य, तत्त्वज्ञान यांसारख्या क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी बजावलेल्या बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या व्यक्ती अनेक होऊन गेल्या याची आम्हास कल्पना असूनही काही मर्यादा या घालून घ्याव्याच लागल्या, त्याला पर्याय नव्हता. एका परीने बघितले तर, या ग्रंथमालेत अंतर्भूत असलेल्या ६९ लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांचे चरित्र आणि कर्तृत्व शब्दबद्ध करणारा हा ११ हजार छापील पानांचा दस्तऐवज म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साद्यंत आलेखच होय. या संपूर्ण प्रकल्पाची कार्यवाही नेटाने, शिस्तीने आणि शुद्ध संशोधकीय पद्धतीने घडून यावी यासाठी या प्रकल्पाचे सुकाणू पेलण्याची जबाबदारी अरुण टिकेकर, द० ना० धनागरे आणि प्र० ना० परांजपे यांच्यासारख्या तज्ज्ञ, व्यासंगी अभ्यासकांनी स्वीकारली याचा अतिशय आनंद आहे. या ग्रंथसंच प्रकल्पात समाविष्ट असणाऱ्या ६१ समाजपुरुषांचे व्यक्तित्व, कर्तृत्व आणि चरित्र संशोधकीय शिस्तीने परंतु वाचनीय व सुबोध शैलीत अक्षरबद्ध करणारा व्यासंगी संशोधक लेखकांचा सक्रिय सहभाग लाभणे, ही प्रस्तुत प्रकल्पाची दुसरी मोठी कमाई म्हणावयास हवी. ही महाराष्ट्र चरित्र - ग्रंथमाला प्रमुख संपादक, साहाय्यक संपादक, प्रकल्पाचे सल्लागार मंडळ, साहित्यक्षेत्रातील जाणकार मित्र आणि सर्वांत महत्त्वाचा भाग असलेले आमचे सर्व लेखक, चित्रकार रविमुकुल आणि मोहन थत्ते, अक्षररचना व मांडणीकार प्रकाश बाळकृष्ण ढवळे, मुद्रितशोधन करणारे विजय सरदेशपांडे, संदीप तापकीर, ज्योती टिळक, मुद्रक सचिन कुलकर्णी व बांधणीकार सुनील गोविलकर, चित्रा भावे आणि आमच्या कार्यालयीन व्यवस्थापिका अश्विनी सुमंत यांच्या निरलस सहकार्यामुळेच आज साकार झालेली आहे, हे आवर्जून नमूद केलेच पाहिजे. या चरित्रग्रंथ प्रकल्पाचे शिवधनुष्य : श्री गंधर्व-वेद प्रकाशन' या आमच्या संस्थेने का उचलले, असा प्रश्न कोणाच्याही मनात स्वाभाविकच उमटावा. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सुवर्ण महोत्सव हे तर एक मुख्य कारण होतेच. परंतु या मोठ्या प्रकाशकीय / ७