भात--तांदुळाच्या भाताच्या माळा बंगाल्यांतील बर्दवान जिल्ह्यांतील गुशकारा गांवाहून कलकत्ता प्रदर्शनांत आल्या होत्या.
पुत्रंजीव--मुलांच्या गळ्यांत कोणी कोणी याच्या माळा आयुष्यवर्धन हेतूनें घालितात.
बोरू--आसाम प्रांतीं बोरूचे तुकडे कानांत घालतात. कानाची भोकें मोठीं व्हावीं ह्मणून त्याचा गीर त्यांत बसवितात.
चंदन-अजमिरास मुसलमान लोक चंदनाच्या मण्याच्या माळा करून विकतात.
बूरी--सिल्हेत प्रांतीं या झाडाच्या बियाच्या माळा भूतबाधा न व्हावी ह्मणून मुलांच्या गळ्यांत घालतात.
फराप्त--याच्या लांकडाचे दागिने करतात.
राळ--एका प्रकारच्या राळेचे मणी करून गारोडी लोक सांचे मणी ह्मणून विकतात.
सोनें, रुपें, तांबें, पितळ इत्यादि धातूंचे जितकें सामान हिंदुस्थानांत होतें तितके इतर कोणत्याही जिनसाचे होत नसेल. इतर देशांतील लोक दगडाची हत्यारे वापरीत होते. त्यांच्या पूर्वी आमच्या देशांतील लोकांना हत्यारांची माहिती होती इतकेंच नाही, तर ते आपल्या हत्यारांवर सोन्यारुप्याची नक्षी करून त्यांस हिरेमाणकें जडवीत असत. ऋग्वेदांत सोन्याच्या भांड्यांविषयी दिग्दर्शन केलें आहे. त्वष्ट्रा नांवाचा ( दैविक शिल्पकार ) मनुष्य धातूंचीं भांडीं फार उत्तम तऱ्हेचीं करीत होता. परंतु रिभू नांवाचे लोक देवपूजेची भांडी त्याच्याही पेक्षा फार सुरेख करीत त्यामुळें त्यांस आपले प्रतिस्पर्धी मानून त्यांस मारण्याचा प्रयत्न तो करीत होता.व वेदांतच एका ठिकाणीं असे लिहिले आहे कीं त्वष्टा याने त्यांच्या कौशल्याची आपण होऊन पुष्कळ तारीफ केली आहे. पुराणांत तर सोन्यारुप्याच्या व इतर धातूंच्या भांड्यांविषयी पुष्कळ ठिकाणी उल्लेख