हे रासायनीक प्रयोग मिश्र पदार्थांच्या मानानें भिन्न आहेत व एकाच रंगाचा प्रयोग, कापूस, रेशीम, किंवा लोकर याच्याशीं वेगळ्या प्रकारचा घडतो. या तिहींपैकीं प्रत्येकावर रंग चढविण्यास काय काय करावें लागते हे रसायनशास्त्राचा अभ्यास केला नसूनही माहीत झालें. तत्रापि त्यांचें काम केवळ अनुमानावर अवलंबून असल्यामुळें सर्व काळ त्यांच्या हातून चांगलाच रंग तयार होतो असें नाहीं.एकाच रंगाऱ्याच्या हातून एकच रंग कधीं कधीं चांगला वठतो व कधीं बिघडतो. रसायनशास्त्राचा अभ्यास केलेल्या एखाद्या विद्वान् गृहस्थानीं या विषयाकडे लक्ष्य दिल्यास त्यांतल्यात्यांत कांहीं नियम बांधून त्या कामांत पुष्कळ सुधारणा करितां येईल, असें आह्मांस वाटतें.
मुंबई इलाख्यांत कराची, हैदराबाद ( सिंध ) ठठ्ठा, कच्छ, भूज, अमदाबाद, भावनगर, खेडा, बडोदा, भडोच, मालेगांव हीं ठिकाणें जाजम, पासोडी वगैरे छापण्याबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत. कच्छ, नवानगर, धांगद्रा, जुनागड, अमदाबाद, व मुंबई या गांवीं बांधणीचें काम फार चांगलें होतें.
मंजिष्टेचा तांबडा रंग--गुजराथेंत दींव गांवीं मंजिष्ठेचा तांबडा रंग देण्यापूर्वी कापड पापडखाराच्या पाण्यांत बारा तास बुडवून ठेवितात. पक्का रंग देण्याची रीत खालीं लिहिल्याप्रमाणें आहे--
१ खारणी | ( खारांत बुडवणें ) |
२ हर्डाववूं | ( हर्डा चढवणें ) |
३ पासा करवो | ( रंग पक्का करणें ) |
४ विच्छळवूं | ( विसळणें किंवा पाण्यांत आघळणें ) |
५ रंगववूं | ( रंगवणें ) |
६ तापववूं | ( सुखवणें ) |
१ खारणी--बकरीच्या लेंड्या, तिळाचें तेल, सिंधी पापडखार, व पाणी हे चार पदार्थ घ्यावे. पाण्यांत पापडखार टाकून कालवावा, व तो विरघळला ह्मणजे त्यांत तेल टाकून ढवळावें, ह्मणजे पाणी दुधासारखें होतें, त्यांत शेळीच्या लेंड्या कालवाव्या या पाण्यांस कापड घालून आंतल्या आंत मळावें. व नंतर पिळून सुखवावें, याप्रमाणें दिवसातून चार वेळ तेंच कापड पुनः पुनः