पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मला समजून घेतलं असतं तर...


 मुक्काम पोस्ट हिवरे हे तालुका खानापूर जिल्हा सांगलीतील छोटं खेडे. हजारभर वस्ती असावी त्या वेळी. गाव इतकं छोटं की, सगळे सगळ्यांना नावानिशी ओळखत. सारं गाव एक घर असल्यागत. गावाबाहेर शिवारात आमची शिंद्यांची वस्ती होती. चार-पाचच घरं पण पांगलेली. या वस्तीतच माझं घर होतं. वडिलांना आम्ही आबा म्हणायचो नि आईला आऊ. दोघं प्रेमळ. आमच्या घरात दोन भावांत मी एकटीच बहीण. नव्या वर्षाचा नवा सूर्य घेऊन मी १९५६ ला जन्मले म्हणून माझं नाव ‘सूर्या ठेवलं. घरी सर्व शेतावर अवलंबून होतं. चांगली पंचवीस एकर जमीन होती. काही बागायत, काही जिरायत. मी दिसायला काही सुंदर होते असं नाही; पण चपळ, चुणचुणीत, इतर मुलां-मुलींबरोबर शाळेत जायचे. गावात सातवीपर्यंत शिक्षण होतं. हायस्कूलमध्ये गेले तशी पोरं माझी कळ काढू लागली. मला पहिल्यांदा समजंचना... माझ्या का मागं? मी खेळात... अभ्यासात... नाचात पुढे पुढे असायची... गुरुजी कौतुक करायचे. घरी पण आबा, दादा, आऊ सा-यांना कौतुक असायचं! एकदा मी नववीला असताना घरी रडत आले... पोरं छळतात म्हणून.... तसं आऊ-आबांना म्हटली... ते म्हणाले, ‘राहू द्या ते शिक्षणबिक्षन... हात पिवळं करून व्हा मोकळं...' मला आऊचा राग आला. समजून घ्यायचं सोडून मलाच शिक्षा! मला वाईट वाटलं. त्या दिवसापासून मी समदं सोडलं... मुकी... बहिरी... आंधळी झाले... वाटायचं मुलीचा जन्म नको... मुलगा म्हणून जन्मले असते तर स्वातंत्र्यच स्वातंत्र्य... पण इलाज नव्हता.


दुःखहरण/९५