पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तो रूळावर आला. मग कधी कैलासला सांगावं लागलं नाहीत अल्लड वयात कोण चुकतं नाही?
 मीरा बालकल्याण संकुलाचं काम अनुताईंच्या शिकवणुकीनुसार करत राहायची. इतर बायका संस्थेतल्या मुलांना हिडीसफिडीस करत राहायच्या. मीराला अनुताई आठवायच्या... अन् आठवायचं आपलं बालपण... अनाथपण. तिनं पडेल ती ड्यूटी, कामं तिने तक्रार न करता केली. त्याचं तिला फळ मिळालं. संस्थेनं आपल्या सुवर्ण महोत्सवात ‘आदर्श कर्मचारी निवडायचं ठरल्यावर मीराची एकमताने झालेली निवड हा तिच्या समर्पित वृत्तीचा गौरव होता.
 मीराचं आज स्वतःचं घर, दोन्ही मुलांचे सुखी संसार, बिपीन व तिला मासिक पेन्शन, घरी गाडी... घर झालं... तेव्हा सर्वांनी मिळून मीराचं नाव घरास ठेवलं ‘सरोज कुंज' (मीराचं लग्नानंतरचं नाव ‘सरोज') तेव्हा मीराच्या डोळ्यांत जे आनंदाश्रू उपस्थितांनी पाहिले त्यात तिनं सोसलेलं सारं दुःख वाहून गेलं. इतके दिवस संकुलातील ३०-३५ अनाथ अर्भकांचं शी-शू, जेवण, धुणं, भरवणं, सफाई करणारी मीरा... तिला घरची चार नातवंडं, दोन सुना, मुलं नवरा सांभाळताना वाईच हलकंच वाटत राहतं.

 मीरा नि बिपिनला आता मी तीर्थयात्रेला जाताना पाहतो, रोज सकाळ संध्याकाळी फिरायला जाताना पाहतो, सहपरिवार गाडीतून इकडे तिकडे भटकताना पाहतो तेव्हा हे खरंच वाटत नाही. स्वप्न वाटावं असं वास्तव मीराच्या वाट्याला आलं. ते संसाराचं सारं विष, हलाहल तिनं पचवलं म्हणून! मीरा आपल्या या साच्या सुखाचं श्रेय संकुलातील अनाथ मुलांच्या सेवेस देते, तेव्हा लक्षात येतं की, तिच्या जीवनात सुरुवातीपासूनच एक कृतज्ञता, समर्पणाचा भाव भरलेला असायचा. ती जीवनभर अबोल राहिली ‘मैं नहीं, मेरा काम बोलेगा' असा तिचा मूक आविर्भाव न बोलता बरंच सांगून जायचा. बालकल्याण संकुलातील मुलांना देणगी म्हणून बरंच देत. खाऊ, खेळणी, कपडे, फटाके ते मुलांबरोबर कर्मचा-यांनाही देत मीरानं नोकरीच्या काळात त्यातली टाचणीही कधी घरी आणली नाही. ती तिथंच कपाटात ठेवायची. ही गोष्ट छोटी असली तरी बरंच सांगून जायची. नोकरीच्या काळात देशमुख बाई'नी (मीरा) कधी कुणाचं 'ब्र' ऐकून घेतलं नाही. (खरं तर 'ब्र' काढायची कुणाची हिम्मत झाली नाही!) हे सारं तिनं उपकार म्हणून नाही, ऋण फेडण्याच्या भावनेनं केलं. म्हणून उत्तरायुष्यात तिला सारं भरभरून मिळालं!

दुःखहरण/७३