Jump to content

पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सूरदास नव्हे, कालिदास!


 सन १९८८-८९ ची गोष्ट असेल. आमच्या बालकल्याण संकुलात पोलीस एका तीन-चार वर्षांच्या छोट्या मुलाला घेऊन आले. पोलीस जीप संस्थेच्या दारात थांबली की ठरलेलं... कोणीतरी बालगुन्हेगार, पाकीटमार, रेल्वेत विना तिकीट सापडलेला, चुकलेला मुलगा-मुलगी असणार... पण आज आणलेला मुलगा नेहमीपेक्षा वेगळा होता. एक तर तो आंधळा होता... त्याला बोलता येत नव्हतं... आम्ही काय बोलतो ते त्याला कळत नव्हतं. लेडी पोलीस सांगत होत्या की अंबाबाईच्या देवळात त्याला त्याची आई दुकानाच्या फळीवर खाऊ आणतो म्हणून सोडून गेलीय... तीन चार दिवस झाले ती देवळात घुटमळत होती. असं दुकानदार सांगत होते... कन्नड बोलायची... रबकईची असल्याचं सांगत होती.

 मुलगा लहान असल्यानं, मुका, आंधळा असल्यानं त्याला आम्ही आमच्या वात्सल्य बालसदन' या पाळणाघरात ठेवलं. तिथल्या काळजीवाहिका मावशींना त्याची विशेष काळजी घेण्यास सांगितले. आमच्याकडे नवीन प्रवेश झालेल्या मुला-मुलींची आम्ही सर्व माहिती एका फाईलमध्ये ठेवत असतो... पोलीस वॉरंट, रिपोर्ट, प्रवेश अर्ज, आरोग्य तपासणी अहवाल, दाखला, गृह चौकशी अहवाल, पोलीस तपास अहवाल इ. सारं त्यात असायचं. वात्सल्य बालसदनाच्या मुलांसाठी डॉ. विजय कारंडे, डॉ. सौ. भांडारकर मुलांची आरोग्यतपासणी इ. पाहायचे. त। दिवशी डॉ. विजय कारंडे आले होते. त्यांनी मुलाची तपासणी केली. तो आंधळा होता म्हणून मी सूरदास नाव सुचवलं. आलेल्या मुला-मुलींची

दुःखहरण/१०५