पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि स्वातंत्र्याचा जयजयकार करताना बेभान झालेली मंडळी हे विसरणारच की सुरक्षिततेच्या किमान सोयी उपलब्ध नसतील तर ते स्वातंत्र्य खोटे असते. नोकरी असताना सुद्धा दयनीय असणारा मास्तर पेन्शनवर निघाल्यावर तर अधिकच दयनीय होतो. कै. माटे यांनी मास्तरांनी कितवे वर्षी मरावे या विषयावर एक लेखच लिहिला आहे. त्यांचे म्हणणे असे की मास्तराने फार तर साठ वर्षे जगावे. या पेक्षा जास्त जगू नये. कारण पुढे सन्मानाने जगण्याच्या सोयीच नसतात.

 मानवी जीवनाचा व्यवहार कठोर वास्तव आणि सांस्कृतिक स्वप्ने यांची सरभेसळ करीत चालणारा व्यवहार आहे. संस्कृती आणि परंपरा यांनी उभारलेली स्वप्ने व खांद्यावर टाकलेले दायित्त्व आणि कठोर वास्तव यांच्यात असणारा विसवाद मास्तरांच्या जीवनात फार स्पष्टपणे दिसणारा आहे. शास्त्रीय विचार करणारा माणूस असे म्हणेल, की पैसा हे मूल्य मानणारा समाज बदलल्याविना मास्तरसारखा सांस्कृतिक प्राणी प्रतिष्ठित होणार नाही. तोपावेतो मास्तर असुरक्षित राहणारच. कवीच्या जाणिवा मात्र या पद्धतीने जाणार नाहीत. त्यापेक्षा निराळ्या पद्धतीने व्यक्त होणार.

 शरद देशमुख संवाद विसंवाद टिपत कविता लिहितात. काळ पुढे पुढे जात आहे असे ते म्हणतात. काळ पुढे जात आहे या विधानाचा नक्की अर्थ काय? रोज सूर्य उगवतो, नंतर माध्यान्ही येऊन नंतर मावळतो. असे वारंवार घडत जाते व म्हणून वय वाढत जाते. बालके तरुण होतात, म्हातारे मरून जातात. हे तर नित्यनेमिक्रमाने काळाचे पुढे जाणे आहेच पण या खेरीज प्रगतीची एक कल्पना आहे. सारखी प्रगती होते आहे. खरेच प्रगती होते आहे का ही बाब विवाद्य मानता येईल. पण प्रगती होते आहे ही समजूत आहे आणि काळ बदलत चालला, समाज बिघडत चालला अशीही एक समजूत आहे. परिवर्तन, प्रगती व अध:पात अशा तिन्ही सूचना देणारे हे विधान आहे. काळ पुढे पुढे जात आहे. कवीला या तीनपैकी काय पटतं? कवीला सगळेच जाणवते आणि काहीच नक्की जाणवत नाही.

 पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते म्हणूनच तर दिवस-रात्र होतात. काळ पुढे जातो. पण मास्तर जेव्हा भूगोलाचा तास घेतात तेव्हा या तासासाठी टेबलावर ठेवलेला पृथ्वीगोलही फिरतच असतो. वर्गातील पृथ्वीगोलाला उचलणारे, नेणारे, फिरविणारे, थांबविणारे भूगोलाचे मास्तर समाजाचे नियमन करणारे, त्याला वळण लावणारे, गती देणारे समजायचे का? कवीचे या बाबत काहीच

७४ / थेंब अत्तराचे