पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काय आवडते अगर आवडावे याविषयी प्रौढांच्या मूल्यमापनाला येथे शून्य किंमत आहे. जोपर्यंत मनाने त्या जगात जाता येत नाही तोपर्यंत हे आकलन वायाच जाणार आहे. तिसरा एक गैरसमज असा आहे की मुलांच्या जगात मुलेच असतात. प्रौढांच्या जगातही फक्त प्रौढ नसतात. प्रौढांच्या जगात मुले असतात. त्याप्रमाणे मुलांच्या जगातही सर्व प्रौढ असतात. आईबाप, आजाआजी, राजे, राण्या, सरदार, ऋषीमुनी, देव आणि राक्षस हा सगळा बालजगाचा भाग असतो. वाङ्‌मयातील व्यक्ती लहान मुले असल्या म्हणजे ते बालवाङ्‌मय होत नाही. सुदैवाने हे तिन्ही दोष वसेकरांच्या कवितांच्यामधून दूर राहिलेले दिसतात.

 म्हणूनच असे म्हणावे लागते की, लहान मुलांचे एक स्वतंत्र जग आहे.या जगात आपण पाहतो त्या सर्व व्यक्ती आहेत. पण या व्यक्तीचे आकलन जे त्या बालमनाला होते ते या जगात् सत्य आहे. म्हणून बालवाङ्‌मयातील कल्पना विलास निराळाच असतो. तसेच बालवाङ्‌मयातील अद्भुतही निराळे असते. प्रौढ वाङ्‌मयातले अद्भुत हे बालवाङ्‌मयात चालणार नाही. या बालवाङ्‌मयात प्रौढ वाङ्‌मयातील सर्व रस असतात पण हे रस त्या जगाला जसे जाणवतील तसे असतात. त्यांच्या शृंगाराला तुम्हा प्रौढांच्या शृंगाराचे स्वरूप असणार नाही. एखाद्या मुलाने जर आपल्या वडिलांच्याकडे जाऊन सरळ आपण आपल्या आजीशी लग्न करणार आहोत अशी मागणी केली तर ही मागणी त्या जगापुरती गंभीर मागणी असते. तुम्ही माझ्या आईशी लग्न केले, सबब मी तुमच्या आईशी लग्न करतो. असा न्याय्य हक्काचा भागही त्यात असतो आणि खरोखरच आजीविषयी लग्न करण्याइतकी उत्कट रतीही त्या बालप्रियकराला जाणवत असते. ते जग शिल्लक आहे तोपर्यंत हा शृंगार ताजा असतो. या भावनेला आपण आपल्या मापाने मोजणे हाच वेडेपणा आहे. म्हणून या जगातले रस हे त्या जगापुरते खरे मानायला आपण शिकले पाहिजे. बालवाङ्‌मय आपल्या श्रोत्यांना काही शिकवील पण त्यापूर्वी या श्रोत्यांच्या बापपिढीने मुलाच्या जगाची स्वयंपूर्णता व सुसंगती समजून घेतली पाहिजे.

 खरे म्हणजे बालवाङ्‌मय हा वाङ्‌मयसमूहाचा भाग आहे. वयाच्या तिसरे चौथे वर्षांपासून सहावे सातवे वर्षी पर्यंत जे जग असते त्याचे स्वरूप अगदी निराळे आहे. सहा ते दहा, दहा ते चौदा या गटातील मुलाचे जग अगदी निराळे आहे. चौदा ते अठरा हा गट बालवाङ्‌मयाचा समजावा की प्रौढवाङ्‌मयाचा समजावा हा विवाद्य प्रश्न आहे. या सर्वच गटांच्यासाठी एक प्रकारचे वाङ्‌मय उपयोगी पडणार नाही. आणि प्रत्येक गटात पुन्हा त्या जगातले वास्तववादी वाङ्‌मय आहे. त्या जगातले स्वप्नाळू वाङ्मङ्‌म आहे. बालवाङ्‌मयाच्या वास्तव जगाला स्वत:चा

पऱ्यांची शाळा / ४३