पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर त्यांना निसर्ग रमणीय, मोहक आणि सूखद वाटणारच. कारण निसर्ग सुंदर सुद्धा असतोच. हे वाटणे आपण गृहीतच धरतो. पण जे नित्य त्याच्या सहवासात वावरतात त्यांना निसर्ग उद्ध्वस्त, रूक्ष, भयानकही जाणवतो हे आपण समजून घेत नाही. खरे तर असे आहे की निसर्गाला केवळ निसर्ग म्हणून कवितेत जागाच नसते. माणूस आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जी अनेक साधने वापरतो त्यांपैकी एक साधन निसर्ग असतो. उपमानाची उचल करणे हा भाषेचा स्वभाव असतो. शतकानुशतके आपण निसर्गाने वेढलेलो आहो, त्याचेच अपत्य आहोत. निसर्गावर संस्कार करीत आणि आपणावरील त्याचे संस्कार पचवीतच आपण वाढलो आहो. हा नित्य सखा निसर्ग उपमान म्हणन आपल्या कवितेत असणारच.

 मराठी कवितेने निसर्गाची अतिशय मोहक, भावगर्भ व तरल रूपे पाहिलेला आहेत. बालकवींच्यापासून महानोरांच्यापर्यंत ही नित्य नवे सौंदर्य साकार करणारी रूपे आपण पाहतोच आहो. राजा मुकुंदांच्या कवितेतही ही रूपे आहेतच. पण हा निसर्ग जितके उदास आणि उद्ध्वस्त रूप घेऊन या कवितेत अवतरतो तितका उदास, उद्ध्वस्त तो फार कमी वेळा पाहण्यास सापडतो. उद्ध्वस्त निसर्गाच्या कुशीत विसावलेले एक उद्ध्वस्त खेडे आणि त्यात राहणारा तितकाच उद्ध्वस्त कवी जर या कवितेतून वाचकांना जाणवत असेल तर ते कवितेचे यश आहे. हा अनुभव व्यक्त करण्यासाठीच ही कविता आहे.

 माणसाला होणारी भयानक एकाकीपणाची जाणीव, त्याला जाणवणारी विफलता हा यंत्राचा परिणाम नसतो. यंत्र हा दिलासाही असतो आणि शापही असतो. ती यंत्रे कोण कुणासाठी वापरीत आहे यावर सारे अवलंबून असते. म्हणून दोष असला तर तो त्या युगातील समाज रचनेचा असतो. या रचनेला यंत्रयुग म्हणणे सोयीस्कर असेल तर तसे म्हणायला हरकत नाही. पण जळणाऱ्या घराची जबाबदारी पेटविणाऱ्यावर टाकण्याऐवजी अग्नीवर टाकून जे समाधान आपण मिळवतो ते खोटे असते. दोष ज्या रचनेत असतो ती रचना यंत्रांनी पेरलेल्या नागर जीवनाला जितके एकाकी आणि विफल करते तितकेच पोरके आणि विफल, यंत्रापासून दूर असणाऱ्या खेड्यांना करते. खेड्यातील वैफल्यच शहरात साठत असते हे आपण विसरतो. शेतांनी, जंगलांनी घेरलेली अशी विफलता राजा मुकुंदांच्या कवितेत दिसेल. ती नगरात राहणाऱ्या आपणाला ओळखीची वाटेल.

 राजा मुकुंदांच्या कवितेत विखुरलेल्या साऱ्या प्रतिमांना एक शाश्वत औदासीन्याचा गंध आहे. सकाळ होते तेव्हा सूर्य उगवत नाही, किरणे दिसत नाहीत. रात्री निर्माण झालेले आशाळभूत पाड भल्या पहाटे गळून पडतात.

तणावा / ३७