पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामील व्हा" हा शुद्ध राष्ट्रवादी लढाही प्रत्यक्षात हिंदु-मुसलमानांचा झगडा म्हणूनच लढला गेला. नेत्यांची इच्छा नसतानाही! यामुळे महाजनांनी मोत्याचा विचार घरभेदी, आक्रमक, विश्वासघातकी, ऐतखाऊ अशा बोक्याच्या संदर्भात केला आहे. हे काव्य हैद्राबाद संस्थानात लिहिले गेले आहे हे विसरताच महाजनांना अन्याय होण्याची भीती आहे.

 या खण्डकाव्यात हरिजनांचा प्रश्न भूतदयेच्या व करुणेच्या दृष्टिकोनातून रंगविण्यात आलेला आहे. 'मोत्याची मागणी' थोडक्यात अस्पृश्यांचा विटाळ मानू नये व त्यांना देवस्थाने, सार्वजनिक जागा बंद नसाव्यात इतकीच आहे. खरोखरी अस्पृश्यांचा प्रश्न व त्यांच्या मागणीचे स्वरूप यापेक्षा किती तरी व्यापक आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकाला जे जे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक, सांस्कृतिक हक्क आहेत ते ते सारे भारताचे एक नागरिक म्हणून सर्व हरिजनांना मिळाले पाहिजेत. अर्थात हा झगडा हक्काचा असल्यामुळे अस्पृश्यांतील जागृती व त्यांच्या बलाढ्य संघटनेची लोकशाहीला घ्यावी लागणारी दखल यांवरच लढला जाणार आहे. महात्माजींची अस्पृश्योद्धाराची चळवळ शेवटी उच्च वर्गीयांच्या नेतृत्वाखालील चळवळ असल्यामुळे अस्पृश्यांच्या अंगी 'अस्मिता' निर्माण करण्याचे काम करू शकली नाही. अस्पृश्यांच्यासाठी महाजन जे मागू इच्छितात ते, हरिजनांना जे हवे आहे त्या मानाने फारच थोडे आहे. हरिजनांना 'न्याय' हवा आहे. महाजन दया देत आहेत. हे काव्य सनातन धर्मावर दृढ श्रद्धा असणाऱ्या श्रद्धावान धार्मिक कवीने उच्चवर्गीयांच्या परिसरात स्वत:वर बहिष्कार पुकारला गेला असताना संस्थानातील हरिजनांत जागृतीची पूर्वचिन्हे देखील दिसत नसताना लिहिले गेले आहे. ज्या काळी, ज्या स्थळी हे काव्य निर्माण झाले त्या काळी, त्या स्थळी या काव्याचा जाहीर पुरस्कार करणेसुद्धा कठीण होते. हा संदर्भ ध्यानात न घेतला तरीही महाजनांना अन्याय होईलच.

 हिंदुधर्माचा प्रतिनिधी म्हणून या काव्यांत शास्त्रीबोवांची योजना करण्यात आली आहे. शास्त्रीबुवांची धर्मनिष्ठा हाच मोत्याच्या मार्गातला या काव्यात तरी फार मोठा अडथळा दिसतो. अस्पृश्य समाजाची दीर्घकालीन सेवा केल्यानंतर डॉ. आंबेडकरांना या प्रश्नात जे अडथळे दृष्टोत्पत्तीस आले ते साधारणत: चार आहेत. (१) अस्पृश्यांचा शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा, (२) अस्पृश्याचा परस्परांतील कडवा जातिभेद, (३) ब्राह्मणवर्गाचा विरोध आणि (४) ब्राह्मणेतर वर्गाचा विरोध. अस्पृश्योद्धाराच्या चळवळी एकीकडे, त्यांचा शैक्षणिक मागासलपणा

१६ / थेंब अत्तराचे