पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महात्मा गांधींना अनावृत्त पत्र

 श्रद्धेय बापू,
 सादर प्रणाम
 तुम्हास हे पत्र मी पोस्टानेच पाठविणार होतो, पण ते वेळेत तुम्हास मिळेल याची खात्री नाही. स्वातंत्र्याच्या गेल्या साठ वर्षांत पोस्टाने येथील सामान्य माणसास सेवा अनुभवाने जिंकले नाही, जिंकता आले नाही. तुमच्यावर त्यांनी किती तिकिटे, कार्ड, पाकिटे काढली तरी! कुरियरनी पाठवायचे म्हटले तर ती सेवा इतकी महागडी आहे की सामान्य भारतीयाला ती परवडत नाही. म्हणून हे अनावृत्त पत्र! सुदैवाने वृत्तपत्र रोज नि वेळेवर प्रकाशित होत आहेत, नि स्पर्धेमुळे स्वस्तही आहेत.
 आज हे अनावृत्त पत्र लिहिण्याचे कारण खरंतर अस्वस्थता हेच आहे. तुमचे विचार, आचार हा माणसाचा रोजचा व्यवहार झाला तरच तुम्हाला अपेक्षित खरा भारत आकारास येईल. तसे घडताना मात्र दिसत नाही. एका चित्रपटाचं प्रदर्शन झालं की नवी फॅशन येते, तसं तुमचं येणं (नि जाणंही) ही काही परिवर्तनाची नांदी नव्हे! शिवाय या परिवर्तनाची नांदी ठरणारे ‘हिरो’, त्यांचा इतिहास, त्यांचे चरित्र, त्यांच्या दोन ऑक्टोबरच्या दिवशी प्रसिद्धीमाध्यमातून प्रक्षेपित झालेल्या मुलाखती सारा एक राजकीय उथळ बनाव होता.


 गांधी जयंती ही या देशात 'ड्राय डे' म्हणून भारतीयांच्या मुळावर उठत असेल तर असली दारूबंदी न केलेलीच बरी. एका गालावर थप्पड़ दिल्यास दुसरा पुढे करण्याचा तुमचा संयम, हृदयपरिवर्तनाचा मार्ग जर कोणी तिसऱ्या थपडेनं पराभूत करत असेल तर इथे अहिंसा कशी नांदणार?

जाणिवांची आरास/९३