पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ते कायद्यापेक्षा विवेकावर भिस्त ठेवतात. कोणी लाईनमन, कुली पैसे घेताना सापडला तर ते सहसा निलंबित करत नाहीत. त्यांचं विवेक न्यायालय कार्यरत होतं. 'हा सूर्य हा जयद्रथ' होतं. ज्याचे पैसे घेतले त्याला ते परत केले जातात. तेही चारचौघांच्या साक्षीनं. पुढे मग तो माणूस माणसाळतो. माणसास माणसाळण्यासारखं लोकशिक्षण नाही. मेमो, विभागीय चौकशीचे फार्स नाहीत. विवेकासारखं फास्ट ट्रॅक कोर्ट दुसरं कोणतं?
 तुकाराम भिसे वेडे, वेंधळे नाहीत. त्यांचा स्वतःच्या भाबडेपणावर प्रचंड विश्वास. पाप, पुण्य, प्रायश्चित्ताचं त्यांचं एक व्यवहारी अध्यात्म आहे. त्यापुढं सैतानही हात टोकतो. असा अनुभव तुकारामांचा विवेक कुणी अनुल्लेखांनी मारला, कुणी उपरोधानी; पण आपला विवेक रक्तबीजासारखा अमर्त्य आहे यावर त्यांची अटळ श्रद्धा आहे.
 त्यांच्यात मला माणूस भेटला. म्हणून ते ‘धनगरवाडा' प्रकाशित करू शकले. लोकांनी अभिनंदनाची फुलं दिली, ती त्यांनी खुर्चीच्या परंपरेस वाहिली. ते रोज आपल्या पूर्वसुरींचे स्मरण करतात नि म्हणतात, 'ही खुर्ची जनतेच्या सेवेचं सिंहासन आहे. ते भ्रष्ट होता कामा नये. माझा विवेक ढळू देऊ नको' एकदा ते एकाक्षणी लढून हरले. ठरवलं आपणही पैसे घ्यायचे. त्यांनी मागून बघितले. त्यांना कुणी पैसे द्यायला धजलं नाही. त्यांच्या लक्षात आलं, नागड्यांच्या राज्यात अजून कापडाची शर्म शिल्लक आहे. जव्हार, मुखेडसारख्या कुणी न जाणाच्या ठिकाणी मागून बदली घेणारे तुकाराम भिसे हे कलियुगातील धर्मराज होत.
 मूर्खांच्या नंदनवनातील शहाणी माणसं अपवादानं जन्मतात म्हणून सभ्यता, सचोटी, सज्जनपणाच्या पाऊलखुणा मागं राहतात. मग असा एक प्रकाशपुत्र जन्मतो. तो पणतीच्या नम्रतेनं सूर्याचा अहंकार दूर करत राहतो नि म्हणून शरदाच्या चांदण्याला बहर येतो. 'प्रकाशयात्रा' नावाचं आठ पानी मासिक आपल्या परीनं अंधाराच्या अष्टदिशा हटवत राहतं एक काजवा बनून सांगत राहतं. सूर्य बनता न आल्याचा विषाद विसरून जा. काजवा बनू शकलो याचा ब्रह्मानंद मिळवा. एक दिवस असा येईल, अंधारलेला ‘प्रकाशगड' स्वयंप्रकाशित होईल.

***

जाणिवांची आरास/९२