पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लाकडाची बाहुली जाऊन डोळे मिचकावणारी (व मारणारीही) बार्बी डॉल आली. अॅटो टाईजचा जमाना आला.
 किल्ली फिरवली की जग फिरू लागलं! या सर्वात सानेगुरुजींच्या ‘गोड गोष्टी', ना. ग. गोरेंचं ‘करवंद', पंडित नेहरुंचे ‘इंदिरेस पत्र', वि. स. खांडेकरांचं ‘सूर्यास्त', विंदांची ‘बालगीतं' कुठे हरवली ते कळलंसुद्धा नाही.
 हे वर्ष प्रेमचंदांचं शतकोत्तर रजत वर्ष, प्रेमचंदांनी मुलांसाठीच्या ‘ईदगाह', ‘बडे भाईसाब' सारख्या कथा लिहिल्या. त्यांच्याप्रमाणे महादेवी वर्मांनी हिंदीत ‘घीसा' या शिकू इच्छिणाऱ्या मुलाचे शब्दचित्र रेखाटून प्रत्येक वाचकाचे डोळे पाणावले. त्यांचंही जन्मशताब्दी वर्ष. 'अपना अपना भाग्य' मधून बालमजुराचं दुःख रेखाटणाऱ्या जैनेंद्र कुमारांचंही शताब्दी वर्ष!
 या साऱ्यांनी मुलांसाठी लिहिलेल्या साहित्याला ओहोटी लागताना पाहून आश्चर्य वाटतं. वनातच जंगलतोड झाली असती तर वृक्षारोपणाने भरून काढता आली असती. मनात झालेल्या जग तोडीला हृदयारोपणाने समृद्ध करण्याचा उपाय अजून माणसाच्या हाती यायचा आहे. तोवर तरी वाचनाचे जंगल दाट, घनदाट करणे गरजेचे आहे. जागतिकीकरणाच्या घुसखोरीत या मातीत न रूजणारी जर्मिनेटर येऊ घातली आहे. पेंग्विन, ऑक्सफर्ड, केंब्रीज, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या प्रकाशन व वितरण संस्था भारताच्या समृद्ध बालपणावर डल्ला मारू पाहत आहेत. नवश्रीमंतीच्या कैफात आपल्या मुलांच्या हाती बंदुका देणाऱ्यांनी रुपया किमतीची लाखगुणी पुस्तकं अव्हेरली तर ती आपली बौद्धिक दिवाळखोरी ठरेल. शिवाय पिढीची केलेली कत्तलही! हे होऊ द्यायचं नसेल तर मुलांना सांगितलं पाहिजे, “देशी वाचाल तर परदेशात वाचाल."

***

जाणिवांची आरास/७६