पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रतिनिधी आहे ज्या पिढीस आपल्या दुष्कृत्याबद्दल पश्चात्ताप वाटतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलांची माफी मागणे, मुलांची प्रौढांनी माफी मागण्यासारखा श्रेष्ठ संस्कार नाही. त्यात मनुष्य निरहंकारी होतो. खलील जिब्रानने ‘प्रोफेट' या आपल्या महाकाव्यात प्रश्न केला आहे. "त्याला तुम्ही कोणते शासन कराल, की ज्याचा पश्चात्ताप त्याच्या दुष्कृत्यातून अधिक मोठा आहे?"
  झिदानने आपल्या माफीनाम्यात विचारलेला हा प्रश्न मला तितकाच महत्त्वाचा वाटतो की चूक करणाऱ्यालाच शिक्षा का? चुकीस प्रवृत्त करणाऱ्याला का नाही? याचाही समाजाने अपराध, शिक्षा, कायदा इत्यादी संदर्भात विचार केला पाहिजे असे मला वाटते. महात्मा गांधी एकदा म्हणाले होते की, “अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा अधिक दोषी आहे.
 झिदानच्या संदर्भात मला वाटते की त्याला काय शिक्षा द्यायची, जो शरीराने हत्या करणारा आहे. पण, ज्याच्या आत्म्याचीच हत्या झाला आहे. त्याचे काय? पश्चात्तापासारखं दुसरं प्रायश्चित्त असूच शकत नाही. अपराध नि शासन ह्या दोन्ही गोष्टी मोठ्या गुंतागुंतीच्या आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य करताना गेल्या सहा वर्षात ज्या शेकडो बंदिजनांच्या संपर्कात मी आलो, त्यांच्याशी बोलत असताना मला लक्षात आले की त्यातील अधिकांशांनी क्षणिक क्रोध, प्रतिक्रिया म्हणून अपराध केला आहे. आपण जे केलं त्याचा त्यांना इतका पश्चात्ताप असतो की औपचारिक शिक्षा ही वरवरची गोष्ट राहते. त्यांना सर्वाधिक मोठी शिक्षा असते, त्यांना वारंवार होणारा पश्चात्ताप. पश्चात्तापाच्या प्रायश्चित्तानंतर आणखी शिक्षा द्यायलाच हवी का?

***

जाणिवांची आरास/७२