पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मला आजही माणसाच्या सोबतीपेक्षा अधिक जवळचे वाटतात. धारोष्ण दुधाची चव मी पहिल्यांदा चाखली ती इथंच. भावोजींच्या खांद्यावर बसून शेत, खळे, ओढे, विहिरी पाहिल्या तेव्हा मी किती आश्चर्यगूढ झालो होतो. 'राम राम पाव्हणं','घासभर खाणार का?','वाईच चा घ्या की'चा तो माणूसपणानी भरलेला संवाद आजही माझ्या कानात तसाच घोंघावत होता.मी त्या गावी पोहोचलो नि गावाची वेश, विहीर शोधत राहिलो.तिथं त्या खुणा होत्या,पण त्यांचे चेहरे,त्यांची ओळख बदललेली होती.
 पूर्वी वेशीचं दार बंद केलं की गाव बंद व्हायचा.आता दारं कित्येक दिवसांत सताड उघडी असतात.कारण आता या गावाने वेशीबाहेर दूरवर आपले हात-पाय पसरलेत. विहीर आहे पण तिचे पाझर आटलेत.विहीर,ओढे सारे निर्जल, निर्जीव का व्हावेत? तर माणूस निष्ठूर झाला म्हणून.ही त्याची निष्ठूरता निसर्गाशी जशी आहे तशी ती माणसाशी पण!
 नाही म्हणायला त्या आटलेल्या खेड्यात मला एक घोडकेमामा भेटले.ते माझ्या भावोजींचे वर्गमित्र! त्यांना मी आल्याचा कोण आनंद! असा आनंद शहरात नसतो. त्यांनी दिलेला गुळाचा चहा, पण काय प्रेम भरलेलं होतं त्यात म्हणून सांगू? माणुसकीनं भरलेला तो चहा पहिलाच! मामा म्हणाले, “पावणं, मी आता हरीऽ हरी करत टाळ कुटत बसतो. परपंच प्वारं बघत्यात. अध्यात्मच बघा आता सर्व! आतिथ्य नाही केलं तर अध्यात्म हरवतं, असं आमचे गुरुजी सांगतात.'मी मनात म्हणालो,हे जरा शहरात येऊन शिकवा! इथल्या अशा माणुसकीच्या विहिरींचे पाझर केव्हाच आटून गेलेत.

***

जाणिवांची आरास/५४