पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्थेत शिकून-सवरून मोठ्या झालेल्या परंतु नोकरी,रोजगार, व्यवसायाअभावी अद्याप निराधार, निराश्रित असलेल्या तारुण्याच्या उंबरठ्यावरील या मुलांचं मागणं आहे की समाज व शासन सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर दलितांना नि अल्पसंख्यांकांना ज्या सोयी, सवलती, आरक्षण, प्राधान्य, प्रवेश, कर्ज, घर विवाह अनुदान, भूखंड आदी देतं ते सर्व दलितांच्या अगोदर आम्हाला मिळायला हवं. कारण जन्मतारीख, आई, वडील, जात, धर्म, उत्पन्न, रेशनकार्ड असं या भारताचा आम्ही नागरिक म्हणून सिद्ध होऊ असं काहीच आमच्याकडे नसतं. त्यांची मागणीच आहे की आता दलितबांधवांनी, पुरोगामी कार्यकर्त्यांनी व सर्व समाजहितैषी राजकीय शक्तींनी एकत्र येऊन आम्हा वंचितांना - ‘ज्यांना काहीच नाही त्यांना सर्व काही देण्याची प्रतिबद्धता स्वीकारावी व आम्हास सन्मानाने साधार करावं.'
 या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटन व समारोप समारंभात भाषण करताना खरंतर मी तुमच्यासारखाच निरुत्तर होतो. मेळाव्यातील मुले-मुली मेळाव्यापूर्वी, मेळाव्यात नि मेळाव्यानंतरही एकच प्रश्न विचारत होती. आम्ही अनाथ, निराधार झालो यात आमचा काय दोष? आमचा काय गुन्हा? त्यांच्या या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी आता शासन व समाजाची आहे. प्रश्न समाजाने निर्माण केला आहे. समाजानेच तो नको का सोडवायला? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या धर्मव्यवस्थेस कंटाळून धर्म नाकारला, सोडला. ते आठवून याक्षणी माझ्या मनात येतं ही आजची या मुलांची स्थिती पाहून त्यांनी काय-काय नाकारलं असतं? जात! धर्म!! नागरिकत्व!!!

***

जाणिवांची आरास/४८