पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमचा काय गुन्हा?

 गेल्या आठवड्यात औरंगाबादला अनाथाश्रम,रिमांड होम, बालगृह,बालसदन,अनुरक्षण गृह,स्वीकारगृहासारख्या संस्थांत राहून मोठ्या झालेल्या परंतु तरीही निराधार,निराश्रित बेरोजगार राहिलेल्या विदर्भ,मराठवाड्यातील युवक-युवतींचा एक आगळा-वेगळा मेळावा संपन्न झाला.या मेळाव्याचे आयोजन निवासी संस्थांतर्गत बालकांचे गुणवत्तापूर्ण संगोपन व पुनर्वसन कार्य करणाऱ्या एका चळवळीने केले होते.निवासी संस्थाश्रयी युवक संघटनेने यात पुढाकार घेतला होता.महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने हा मेळावा यशस्वी व्हावा म्हणून सर्वतोपरी सहकार्य दिले होते.जळगाव, जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद,पैठण,औरंगाबाद अशा ठिकाणांहून सुमारे २५० मुले-मुली पदरमोड करून या कार्यक्रमास उपस्थित होती.
 मेळाव्यातील प्रत्येक मुला-मुलींच्या डोळ्यात मी आशेचे लक्षलक्ष दीप जागताना अनुभवले.भरपूर भोगलंय;अजून भोगायची प्रतिबद्धता त्यांच्या निस्तेज चेहऱ्यांवर मी वाचली.कुणाचेच कपडे परीट घडीचे नव्हते.बरीच मुलं अनवाणी होती.काही पायी,काही सायकलनी गावाहून आलेली.इथे कोणीच कुणाचं नव्हतं पण सर्व एकमेकांचे कुणीतरी होते. अनाथपण,उध्वस्तपणानी या साऱ्यांना एकमेकांचे एक करून सोडले होते.

 या मुलांचं मागणं आहे संस्थेत आम्हाला चांगलं सांभाळा.आमचं कोणी नाही म्हणून आम्हाला गुलामासारखे वागवू नका.आमचा शारीरिक,मानसिक,भावनिक, लैंगिक छळ थांबवा.शिकेल तितके आम्हाला शिकू द्या. आम्हाला माणूस म्हणून वागवा नि माणूस म्हणून जगू द्या.

जाणिवांची आरास/४७