पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 दुसरे काँग्रेस पक्षाचे पुढारी. आज रोजी राष्ट्रवादीत डेरेदाखल. एकेकाळी यांनी कोल्हापुरात जनसेना स्थापून येथील सार्वजनिक जीवनात जनमनाचा कळवळा जपला. प्रबोधन हा त्यांचा पिंड. शाहू स्मारक भवनात काही ना काही निमित्त शोधून प्रबोधनाचा यज्ञ जागवण्यात त्यांना मोठा आनंद. कोल्हापूर गॅझेटची दुरुस्ती असो की शाहू महाराजांचा पुतळा उभारावयाचा असो, सतत शासनाच्या मागे हात धुवून लागायचं. त्याशिवाय बहुधा चैन पडत नसावी. भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या माध्यमातून कार्यकर्ता प्रशिक्षण, प्रकाशन, व्याख्यान आदींद्वारे पुरोगामी विचारांची धार ते वाढवत राहतात. या वृत्तीचं प्रतिबिंब त्यांच्या आडनावात दिसतं.
 तिसरे तसे काँग्रेसचेच. पण पक्षापेक्षा पेठेत सतत कार्यरत राहणारे. यांनी हिकमतीने निवडणूक लढवून लोकमताची किमया दाखविली व महापौर होऊन एक नवा वस्तुपाठ मांडला. राजर्षी शाहू महाराजांवरील चित्रमालिका तयार करण्यात त्यांनी किती कोल्हापुरी झिजवल्या हे त्यांचे त्यांना माहीत. विजार, शर्ट असा साधा पोशाख, शिवाजी पेठेला प्रबोधनाची पेठ यांनीच बनविली. कुस्ती, दांडपट्टा, आखाडा ही त्यांची आवडती क्षेत्रं. कुणाचंही काम घ्यायचं नि ते पदरमोड करून करायचं असा त्यांचा छंद. लुनावरून स्वारी अखंड कोल्हापूर, ऊन, पावसात पालथं घालत राहतात. जगासाठी भीक मागणारा हा समाजसेठ, त्याची श्रीमंती काय वर्णावी?
 असे हे तीन ‘सार्वजनिक अण्णा' म्हणजे कोल्हापूरचं सांस्कृतिक संचित, वैभव नि अभिमानाची गोष्ट! निष्कलंक, निष्कपट, निरिच्छ, निःस्पृह. असे हे तीन सार्वजनिक अण्णा! त्यांची नावं वेगळी सांगायची काय गरज? या तिघांपासून आपण घराबाहेर,स्वतः पलीकडे पाहण्यास शिकलं पाहिजे. जो स्वतःसाठी जगतो तो नुसता श्वासोच्छ्वास करत असतो. जो दुसऱ्यासाठी जगतो तो तरतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

***

जाणिवांची आरास/४0