पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तीन सार्वजनिक अण्णा

 कोल्हापुरात तीन अस्वस्थ आत्मे राहतात.राहतात म्हणण्यापेक्षा भटकतात म्हणणे योग्य होईल. कारण ते घरात कमी नि बाहेर जास्त अशी त्यांची स्थिती.त्यांना घरापेक्षा रस्त्यावर येणं अधिक आवडतं.तिघांचे पक्ष वेगळे पण आराध्य एकच.ते म्हणजे शाहू महाराज तिघांना सार्वजनिक धुणी धुवायचा विलक्षण नाद;पण प्रत्येकाचा धुण्याचा घाट वेगळा.लोक घाटावर कपडे धुतात, तर हे बहाद्दर चक्क चौकात,भर चौकात धुणी धुतात.त्यांना धुवायला साबण लागत नाही. फक्त धुणं लागतं. एक बिंदू चौकात, दुसरा दसरा चौकात तर तिसरा उभ्या मारुती चौकात आपापलं काम इमाने इतबारे करतो. योगायोग म्हणजे या तिघांना त्यांचे निकटवर्ती ‘अण्णा' म्हणतात. ते तिघे कोल्हापूरचे सार्वजनिक अण्णाच होत.
 पैकी एकाचा पक्ष कम्युनिस्ट.कायम खांद्यावर लालबावटा, कामगार, मोलकरणी, मजूर, बँकवाले, विमावाले सर्वांना ते संघटित करतात. ते कोल्हापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीचे आता नेतृत्व करतात. व्यवसायाने वकील असल्याने आपल्या मतांची बिनतोड वकिली ही त्यांची खासियत.या गोविंदानी आपला कधी गोपाळकाला होऊ दिला नाही. संघटन, संस्कृती, साहित्य, प्रबोधन, मिळेल त्या मार्गाने सर्वांना घेऊन आपली पुरोगामी विचारांची मशाल ते पथनाट्य, मेळावे, भाषणे, मोर्चे, व्याख्यानमाला, कवी संमेलन, प्रकाशन यांतून पेटवत राहतात. समाजाचे प्रश्न यांना अस्वस्थ करतात असे म्हणण्यापेक्षा यांना पाहून प्रश्न अस्वस्थ होतात, हे म्हणणे अधिक संयुक्तिक व्हावे.

जाणिवांची आरास/३९