पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चैतन्यरथातला बंडखोर आत्मा

 कवी विंदा करंदीकरांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळाल्याचं ऐकलं नि विंदांच्या अनेक आठवणी, ओळींनी एकच कल्लोळ उडवून दिला. काही वर्षांपूर्वी विंदा कोल्हापुरी आले होते. निमित्त होतं महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार वितरणाचं. त्यांना सव्वा दोन लक्ष रुपयांची मिळालेली रक्कम समारंभातच त्यांनी कुटुंब नियोजन कार्यास देऊन टाकली. असंच त्यांनी कबीर पुरस्काराच्या वेळीही केल्याचं आठवतं. लाखो रुपयांच्या पुरस्काराची रक्कम समारंभात दान करून समारंभानंतर पायी चालत जाणारे विंदा. वाटेत चपलेचा अंगठा तुटला नि त्यावेळी ते रुपयासही महाग होते. हे ऐकून कुणास खरं नाही वाटणार!
 महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार स्वीकारला त्यावेळी मी त्यांना बालकल्याण संकुलात घेऊन गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मुलांच्या फर्माईशीनुसार आपल्या कितीतरी बालकविता ऐकवल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुलांशी केलेलं हितगुज माझ्या कानी आजही घुमतं आहे. ते म्हणाले होते, ‘मुलांनो, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हास वार लावून शिकायची नामुष्की नाही. इथे तुम्हाला सन्मानानं जेवू, खाऊ घातलं जातं. या कोल्हापुरात मी वार लावून शिकलो. वार लावून देणारे उदार होते. पण तसंच जेवणं मनाला टोचत राहायचं.' असंच एकदा कवी नारायण सुर्वेही संकुलात आले होते. 'मी बाळगलेला पोर होतो. तुमचा इथं सांभाळ, संगोपन होतं हे पाहून बरं वाटतं.' म्हणत सुर्वे गदगदून गेलेले आठवतात.

 कवी पुरस्कृत होतो तेव्हा त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो, पण त्याचं रोजचं जीवन मोठे आव्हानांचं असतं. कधीकधी कस्पटाची क्षुद्रता

जाणिवांची आरास/१७