पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



आपल्या मोबाइल्सवरील कॉन्टॅक्टस्, मेसेज, चॅट्स तपासून पहा. काँटॅक्टमध्ये किती विभिन्न जात, धर्मीयांशी आपला संपर्क, संवाद असतो वा संदेशन, संप्रेषण असते? आपण जात, धर्म पुरस्कार करणाच्या पोस्ट लाइक करतो का कमेंट देतो? त्यावरूनही आपण जातीय, धर्मीय आहोत का लक्षात येते.

        ‘जात नाही ती जात' अशी व्याख्या करणारे जात समर्थकच मानायला हवेत. ‘जात जाऊ शकते' मानणारे उदारमतवादी, मानवतावादी, वैश्विक मानायला हवेत. जातभेद भारतातच आहेत. अन्यत्र वंशभेद, धर्मभेद आहेत. तिथे अनेक सकारात्मक कृतीतून यावर त्यांनी विजय मिळवला आहे.

आपणही आरक्षण, अल्पसंख्य विकास आदीमधून तशी सकारात्मकता दाखवतो आहोत. त्याला आपण घटनात्मक दर्जाही बहाल केला आहे. मध्यंतरी भारत सरकारने गॅसवरील सबसिडी स्वेच्छेने सोडण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देणारे भारतीय अनेक कोटी निघाले. भारतीयांची ही सकारात्मक कृती म्हणजे सामाजिक, न्याय व परिवर्तनाच्या दृष्टीने उचललेले स्वेच्छा पाऊलच होते. शांत क्रांती बदलांच्या पावलांसारखी। अदृश्य; पण परिणामकारक असते. जनांच्या प्रवाहाचा विचार न करता । नेहमी प्रवाहाविरुद्ध पोहण्यातूनच नव्या समाजसुधारणा घडत आल्या आहेत. तसे मग स्वेच्छा जात-त्याग हा उपायही प्रभावी ठरू शकतो. जात । सापशिडीसारखी असते. ती कधी तुमचा विकास करते, तर कधी घात. जातीचे फासे नेहमी विधायकच पडतात हा गैरसमज आहे. तिचे तोटेच अधिक.

        माणुसकीचा व्यवहार जातीपलीकडचा असतो. म्हणून कबीरदासांनी लिहून ठेवले आहे की, “जाति न पुछो साधू की, पूछ लीजियो ज्ञान.' सभ्य माणसाची ओळख जातीवरून करण्यापेक्षा त्याच्या ज्ञान, सभ्यता, चारित्र्यावरून व्हायला हवी. या अशा गोष्टी आहेत की, त्रिकालाबाधित. ज्ञान देऊन संपत नाही, सभ्यता दाखवून कमी होत नाही. चारित्र्यासारखा पारदर्शी दुसरा गुण नाही. म्हणून म्हणतो जात सोडून, वजा करून, जगून तर पहा. लक्षात येईल, तो एक टॅबू आहे, टॅग आहे, ट्रेडमार्क नक्की नाही. सोडून पहा. जात झडून जाणे शक्य आहे... कर के देखो...!
         


                            जाणिवांची आरास/१६२