पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आले नाही. कारण दैनंदिन जीवनात जगत असताना इथले नागरिक बंधुता घेऊन जगतात. इथे गणेशोत्सव असो अथवा ईद हिंदू-मुस्लिम मिळून साजरे करतात. हे एकत्व खरं तर आपल्या भाषा, शिक्षण, साहित्यातून अधिक प्रकर्षाने व प्रगल्भपणे जोपासता येईल; पण आपण प्रांतवादाच्या संकीर्णतेमुळे त्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणजे असे की, आपल्या प्रत्येक प्रांताच्या सीमेवर बहुभाषी, बहुलिपी, बहुसांस्कृतिक प्रांत असतात. आपण त्यांचा अभ्यास करायला हवा. आपण पर्यटक म्हणून भारतभ्रमण करतो; पण एक नागरिक म्हणून करतो का? गुजराथी, कन्नड, तेलगू, हिंदी या आपल्या भाषा भगिनी. त्यांचा अंतर्भाव आपल्या शिक्षणात व्हायला हवा. आपण राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची म्हणून भारतीय साहित्य, भारतीय भाषा, भारतीय लिपी, भारतीय संस्कृती असे विषय उच्च शिक्षणात समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, साहित्यशास्त्र यात आणले पाहिजेत. असे लोकशिक्षणच इथल्या संकीर्ण राजकारणास छेद देऊन भारत एकात्म करेल.

      आपल्या देशातील अनेक राजकीय पक्ष, विचारधारा या भेदावर उभ्या असतानाही आपण आपल्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही ही मूल्ये का स्वीकारली तर त्यामागे देश एक ठेवण्याचे भान आहे. देशाचे पूर्वीचे नाव 'हिंदुस्तान' असताना आपण ‘भारत' स्वीकारले. त्यामागेही सर्वसमावेशकता, सहिष्णुता, समन्वय वृत्ती आहे हे नागरिक म्हणून आपणाला विसरता येणार नाही. गोवंश पूजणारा नि गोमांस भक्षण करणारा समाज शतकांपासून इथे गुण्यागोविंदाने नांदतो. त्यामुळे शत्रू इथे येण्यास धजावत नाही. शाकाहार-मांसाहार,आर्य-अनार्य, काळे-गोरे, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत इथे सारखेच. म्हणून ‘मेरा भारत महान!'
     जर्मन कवी व नाटककार गटे जर्मन होते; पण कालिदासाचं 'शाकुंतल' नाटक त्यांनी वाचले होते. रवींद्रनाथ टागोर बंगाली; पण नरसी मेहता, सुब्रह्मण्यम भारती, तिरूवळ्ळूवर आदी कवींचे साहित्य, काव्य त्यांनी मुखोद्गत केले होते. आचार्य विनोबा भावे यांना अनेक भारतीय भाषा यायच्या. साने गुरुजींना म्हणून तर ‘आंतरभारती' नि रवींद्रनाथांना ‘विश्वभारती'चं स्वप्न पडलं होतं, ते भारतात राष्ट्रीय एकात्मता नांदावी म्हणूनच!



                       जाणिवांची आरास/१५६