पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





आकृती बदलणं जसं अटळ ठरतं तसं माणूस स्वभाव, वृत्ती, बोलणं, भूमिका, तत्त्वज्ञान बदलतो. बदलातली ही भ्रामकता माणसात स्वाभाविकच विसंगती निर्माण करते. तो दुस-याकडून जे अपेक्षितो तसं दुस-याशी तो वागतोच असे नाही. त्यामुळेच किंबहुना एकाच माणसाच्या स्वभावाची वर्णने अनेक. ते वर्णन अनुभव, प्रचीती, प्रत्ययांवर अवलंबून असते. घरी मुलांना अतिशय प्रेमळ वाटणारा बाप कार्यालयातील कर्मचारी तसेच सहका-यांना खाष्ट, कठोर वाटू शकतो. किंबहुना, एकच माणूस वेगवेगळ्या स्थळी, काळी, प्रसंगी भिन्न रूप, रंग, वृत्ती घेऊन वागतो आणि जगतो. माणूस समाजशील होण्यातून आलेलं हे परिवर्तन परंपरा म्हणून किंवा दायित्व म्हणून तो निभावत असतो. हे सारं त्याच्यासाठी अटळ होऊन जातं.

        मग, प्रश्न असा पडतो की नेमका माणूस कळायचा तरी कसा? ते कळणं ही महाकठीण गोष्ट आहे खरी! माणसातील खन्याचा शोध ‘क्ष किरण' टाकले तरी लागणे अशक्य. कारण माणूस म्हणजे केवळ हाडामासाचा गोळा नाही. तसेच तो केवळ स्नायू व मज्जातंतूचा पुंजका नाही. त्याला कोणत्याही इतर सजीव प्राण्यापेक्षा दोन शक्ती अधिकच्या लाभल्या आहेत. एक विचार करण्याची शक्ती नि दुसरी त्याच्या मनात निर्माण होणारी भावना. भावना प्राण्यांना पण असतेच. परंतु, माणसाने तार्किक विकास घडवून आणला, त्यातून त्याने अनेक नवनव्या गोष्टींची निर्मिती केली आहे. त्यात संस्कृती ही सर्वांत मोठी गोष्ट त्याने साकारली आहे. प्राणिसंस्कृतीच्या रीतीभाती, सवयी आणि माणसाच्या रूढी, परंपरा, संबंध नाते यांच्या मूलभूत अंतर आहे. प्राण्यांमध्ये नर आणि मादी एवढेच नाते असते. माणसाने अपत्यजन्माच्या विकासात संबंधांना रुढी, परंपरांनी बांधून प्राण्याचा मनुष्य केला आहे. पण त्याच्यात झालेले बदल हे वरवरचे असल्याने त्याच्यात कधी कधी मूळ वृत्ती उफाळून येतातच. त्यामुळे, असे सांगितले गेले आहे की माणसांचे आंतरिक बदल महत्त्वाचे. आंतरिक वृत्ती, स्वभावाचे परिष्करण जो माणूस भूमिका, भान म्हणून स्वीकारतो, तो आत-बाहेर एक असतो. माणसाचं आत-बाहेर एक असणं आदर्श असलं तरी कठीण! ते अवघड आहे. आपल्यातला हिंस्त्रपणा त्याने मारला, त्यामुळे खरंच का माणूस अहिंसक झाला?
      


                         जाणिवांची आरास/१४८