पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परीक्षांचा महापूर
 आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. त्या पाठोपाठ दहावी, मग विद्यापीठ, शाळा, कॉलेजांच्या अनेक परीक्षा येत आहेत. आजचा काळ हा परीक्षांचा झालाय खरा! अगदी बालवाडीच्या प्रवेशालाही सीईटी (प्रवेश परीक्षा) द्यावी लागत आहे. पालकांना द्यावी लागणारी मुलाखत ही त्यांची सत्वपरीक्षाही असते नि अग्निपरीक्षाही! जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास असतो परीक्षांचा चक्रव्यूह. त्यातून कोणीच, कधी सुटला नाही. एखाद्या परीक्षेस जाणं, भिडणं वाघाच्या गुहेत जाणं असतं! पूर्वी नव्हे तितकी स्पर्धा... जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली ती परीक्षांच्या महापुरामुळे! प्रवेश परीक्षा, चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, वार्षिक परीक्षा, वधू परीक्षा, रक्त परीक्षा, थुकी परीक्षा, लघवी परीक्षा, नाडी परीक्षा... एक का शंभर परीक्षा!
 अलीकडे मी सारखा विचार करतो आहे... हे परीक्षांचं पीक फोफावलं कसं? पूर्वी मनुष्य अज्ञानी होता. तो अकुशल होता. अक्षमही होता तो. त्यावेळी त्याला कोणत्याच परीक्षेला तोंड द्यावं लागायचं नाही. श्रमाच्या घामानं शेत भिजायचं. आईच्या मायेनं घराची भिंत सारवली जायची. ताई अंगण सारवायची. चिमणी नि चुलीच्या धुराने घर काजळी धरायचं तेव्हा परीक्षा नव्हती नि काळजी पण! सारं कसं शांत, मुलायम, सुखद होतं! आज सारं कसं झगझगीत, चकचकीत लागतं. असतं ही ते तसं पण आत-आत असतं एक उद्ध्वस्तपण, अस्वस्थपण, हे सारं आधुनिकतेच्या हव्यासातून, ध्यासातून आलं. परीक्षेचा जन्म हा हव्यासाच्या स्पर्धेतून जन्मला.

जाणिवांची आरास/१३७