पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुला-मुलींची. आपल्याला एखादी गोष्ट मूल असताना मिळाली नाही, म्हणून आपण आपल्या पाल्यास तत्परतेने देतो. पण ती देताना जाणीव करून देतो का? उपकाराच्या भावनेने पाल्यास काहीच देऊ नये. जे द्यावं, ते कर्तव्यभावानं. पाल्याच्या बाबतीत तुम्ही निष्काम कर्मयोग आत्मसात केला पाहिजे. द्या आणि विसरून जा. पालकांनी पाल्याच्या बाबतीत फकीर असायला हवं. 'नेकी कर और समुंदर में डाल’, ‘कर्तव्य कर नि विसरून जा.' मुलांकडून अपेक्षा करू नका. तो पाणी पाजेल, तो म्हातारपणात आपली काठी होईल, मुलगी आपण दाखवू त्या स्थळाशी लग्न करेल. मुलांच्या भविष्याची स्वप्न पहा, पण आग्रह करू नका. सक्ती तर नकोच नको.
 चांगले पालक आपल्या पाल्याच्या वाढीबरोबर आपली भूमिका बदलतात. पालक, शिक्षक, मार्गदर्शक, मित्र, निरीक्षक, सल्लागार, त्रयस्थ असा भूमिकेतील बदल जे आत्मसात करतात, त्यांच्या हाती मुलं लागतात. मुलांच्या वाढीबरोबर आपल्याला बदलता आलं पाहिजे. ‘सावध ऐका पुढच्या हाका' या न्यायानं मुलाला केव्हा सांगायचं नि त्याचं केव्हा ऐकायचं याचं तारतम्य पालकांना हवं. जन्मभर मी मुलाचा बाप, मी आई असं असत नाही.
 मुलांना लहानपणी प्रेम देणं, संगोपन करणं, अगदी लाड करणं मुलाची गरज असते. कुमार वय संस्कारांचं असतं. किशोर वयात चांगलं नि वाईट यातला फरक समजावयाला हा. तरुणपणात ध्येय द्यावं, फुलवावं. विकासाच्या सर्व संधी देण्यासाठी जिवाचं रान करावं पण या वयात बंधनांचा कासरा हळूहळू सोडायला शिकावं. मुलांचं वय धोक्याचं झालं की संवाद सुरू ठेवावा. लादणं कमी करावं. मुलं कॉलेजात जाऊ लागली की जोजवणं कमी करावं. जबाबदारी द्यावी. तो मिळवून शिकेल असं पहावं. सारं ऐतं दिलं की मुलं मस्तवाल होतात. परिस्थिती असली तरी मिळवून खायला शिकवा. आपल्याकडे पालक मुलांचा संसारही पेलताना मी पाहतो. मग ती त्यांचे जीवन केव्हा जगणार? त्यांना त्यांचे जीवन जगू द्या. तुम्ही मदतनीस राहा.
 आजचे पालक अनुभवत असताना मला जे वाटलं ते लिहिलं. तुम्हाला काय वाटतं?

जाणिवांची आरास/१३६