पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



पालकत्व

 आज जे पालक आहेत, ते सन १९६० नंतरच्या दशकात जन्मलेले आहेत. ते जन्मले तेव्हा स्वातंत्र्याचे तप उलटून गेलं होतं. भारतात प्रगतीच्या पाऊलखुणा उमटत होत्या. त्यांच्यापूर्वी जे पालक जन्मले त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून आपलं ध्येय प्राप्त केलं. त्यामुळे त्यांनी आपल्या पाल्यास भरभरून दिलं. त्यांची पिढी आज पालकत्व पेलत आहे. स्वातंत्र्याचा खरा लाभ उपभोगलेला वर्ग आज पालक म्हणून सज्ज झाला आहे.
 आज पालकत्वाची एक कल्पना रूढ होताना दिसते आहे. मुलांनी मागेल ते देणं म्हणजे पालकत्व निभावणं. अलीकडे पालक पोस्टमन झालेत. फक्त ‘देणं' (डिलिव्हरी करणं) त्यांना माहीत आहे. पालकत्व म्हणजे देणं' नव्हे तर 'पेलणं' असतं. खलिल जिब्रान नावाचा एक अरबी कवी होता. तो इंग्रजीत लिहायचा. त्याचं एक सुंदर काव्य आहे. ‘प्रोफेट त्याचं नाव. मराठीत त्याचे अनेक अनुवाद उपलब्ध आहेत. त्यानं पालकत्वाबद्दल विस्तारानं लिहिलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार मुलं आपण जन्माला घातली तरी ती आपली नसतात. ती स्वतंत्र जीवन घेऊन जन्मतात. त्यांचे स्वप्न, वृत्ती, विचार सारं त्यांचं घेऊन ती जन्मतात. पालकांचे कार्य धनुष्यासारखं असतं. धनुष्यानं फक्त बाण सोडायचा असतो. दिशा द्यायची असते. अगदी गतीही द्यावी. पण लक्षात असू द्या बाणाचं लक्ष्य स्वतःचं असतं. म्हणून पालकांनी मुलांवर विचार, स्वप्नं लादू नयेत.
 एकदा का हे पक्क स्पष्ट झालं की मग पालकत्व पेलणं, निभावणं सोपं असतं. आपली मुलं ही काही आपल्या छापाच्या मूर्ती नव्हेत. आपण त्यांना सुविधा, संस्कार, संधी द्यायची. संधीचं सोनं करायची जबाबदारी


जाणिवांची आरास/१३५