पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





विकास की विस्तार?

 आपलं रोजचं जीवन एका नव्या पर्वाची नांदी असते. उद्याचा उदय नेहमीच आजच्या खांद्यावर होत असतो. आज जे असतं त्याचं उद्याचं रूप न्यारं नि निराळं असतं खरं! आता हेच पहा ना- आपलं घर, गल्ली, गाव घ्या. त्याचा रोज चेहरा बदलत असतो. ते विस्तारतं की विकसित होतं? मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट घ्या. अगोदर तिचा विस्तार होतो, मग ती विकसित होते. विस्तार भौतिक असतो तसा बाह्य. तो मूर्त असतो, दिसतो. विकासाचं तसं नसतं. तो आंतरिक असतो. दिसत नसला तरी जाणवतो, लहान मुलाचा माणूस होणं अगोदर विस्तार होतो. वाढ होते. मग विकास.

 भारताचा गेल्या साठ वर्षात विस्तार झाला, पण चीनचा विकास झाला हे अनेक उदाहरणांवरून सांगता येईल. चीनपुढे जपानचा आदर्श आहे. आपणापुढे अमेरिकेचा. हा मूलभूत फरक आहे. विस्तारामागे लागलेले पसरतात नि पसारा वाढवितात. विकसित होण्याची प्रक्रिया खोलीकडे कूच करणारी असते. माणसं भौतिक समृद्ध होतात. ती विकसित झाली असं म्हणणं धाडसाचं ठरावं. भौतिक समृद्धी पचवून, प्रसंगी नाकारून जी बौद्धिक, भावनिक विकासाकडे लक्ष देतात ती कालजयी होतात. महात्मा गांधींचं जीवन हे त्याचं एकदम पटणारं उदाहरण. हे सारं माझ्या मनात आलं ते एका साध्या निरीक्षणामुळे. अलीकडे आपल्या आजूबाजूला नि देशात चोहीकडे विस्ताराची धामधूम आहे. महासत्ता होण्याचा ध्यास लावलेल्या या देशात माणसाचं मोठं होणं अटळ खरं! पण ते सारं चाललंय ते मूल्यास बगल देऊन, ती आहे माझी खुपरी नस. मी असं मानतो की थोडं उशिरा

जाणिवांची आरास/११५