पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाढली तितकी बोलणारी माणसे घरात नसतात हा या असंवाद समाज घराचा शाप आपणास कुठे घेऊन जाणार आहे माहीत नाही.
 संवाद ही एक संवेदी क्रिया आहे. ती तुम्हास ब्रह्मानंदाकडे घेऊन जाते. पूर्वी आपण प्रवासात शेजाऱ्यांशी प्रवास संपेपर्यंत हितगुज करायचो, आज आपण प्रवासात वर्तमानपत्र घेतो ते संवाद टाळता यावा म्हणून. माणसास असं कांही वाटतं की बोलू नये? एक तर तो आत्मकेंद्री झाला तसा आत्मसंतुष्टही. नांर्सिसस होऊ पाहात असलेला मनुष्य आत्मकोशातून बाहेर यायला हवा.
 यासाठी आपणास काही गोष्टी सहज करता येईल. जीवनाची गती कमी करायला हवी. गरजांचं क्षितिज ठेंगणं करता आलं तर आपलं रेसचा घोडा होणं थांबेल. दुसरं घरात एकवेळ अशी असावी की सर्व एकत्र आहेत. ताणतणाव नाहीत, व्यवधान नाहीत. त्या वेळी आपण एकमेकांचे एकमेक असू. एक जेवण एकत्र करणं, त्या वेळी फोन, टी.व्ही. बंद करणं. एखादी सुट्टी मिळून जगणं स्वतःला भावलेलं इतरांना मनस्वीपणे सांगणं यातून जगण्याची भागिदारी वाढते हे आपण लक्षात घ्यायला हवं. 'स्व'च्या पलीकडे विचार करण्याचा प्रारंभ म्हणजे माणसाचं समाज होणं. या ओळी लिहित असताना मोहन धारियांचे उपोषण हा एक समाजसंवाद होता. ते शेतकऱ्यांचे कोणी नसताना (नेते आदी) त्यांचे उपोषण करणं ही कृती एक सामाजिक प्रकट संवाद होता. बाळासाहेब भारदेंचं सारं आयुष्य एक कृतीशील संवाद होता. असे स्वतः पलीकडे जगण्यातूनच समाजाची असंवाद अवस्था बोलकी होईल. या तर, बोलू या, बोलके करू या, बोलत राहू या!

***

जाणिवांची आरास/१0८