पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घडीला ‘प्रसंग सार्थक' वाटतात, ती त्यांच्यातील जीवनवेधी हेतुमुळे! ‘मारीच' नाटक लक्ष्यवेधी ठरतं ते आजच्या काळाची प्रतिमा हबेहूब उभा करतं म्हणून. नाटक हा मुळात एक खेळ आहे. नाटक करणं, बसवणं, हे कृत्रिम असतं. बंगालीत ‘नाटक खेलबो' म्हणतात. पूर्वी नाटकांचे 'खेळ' व्हायचे. आज ‘शो' होतात. नाटकातील कलाकारांचं भूमिका वठवणं वेगळं नि ‘जगणं' वेगळे. डॉ. श्रीराम लागूंनी केलेली नटसम्राटाची भूमिका, निळू फुले यांनी ‘सूर्यास्त'मधील वठविलेली मुख्यमंत्र्यांच्या स्वातंत्र्यसैनिक असलेल्या वडिलांची भूमिका, ‘फुलराणी'मधील भक्ती बर्वेची भूमिका ही सारी भूमिका जगण्याची उदाहरणं होत. परवाच्या ‘मारीच' मध्येही प्रभाकर वर्तकांची ‘जादुगार', दिलीप बापटांची 'रावण', सिनेटरची केलेली भूमिका ही ‘जगणं' या मालिकेचा विस्तार होय. नाटकाचा संबंध प्रत्यक्ष जगण्याशी तेव्हा येऊन भिडतो, जेव्हा ते ज्वलंत, समकालीन समस्यांचे भाष्य नि माणसांचं भविष्य होतं. आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात वेगवेगळ्या महासत्ता प्रस्थापित होत आहेत. त्यात सामान्य माणूस उद्ध्वस्त होतो आहे. व्यवहार विवेकास पराभूत करतो आहे. अर्थसत्ता हे यशाचं प्रबळ साधन होऊ पाहणाऱ्या आजच्या काळात माणसाचं ‘मारीचीकरण' सुरू झालंय. अमेरिका राजकीय सत्ता झाली. डॉलर हा पर्यायी पैसा झाला. कट-कारस्थान, युद्ध, गनिमीकावा, कांगावाखोरांची चलती, बुरखाधाऱ्यांची चंगळ, असा एक मायावी बाजार थाटला जातोय. ‘माया म्हणजेच जग आणि जगणं' असं समीकरण रूढ होऊ पाहात असताना अल्पभूधारकांसाठी मोहन धारिया, धरणग्रस्तांसाठी मेधा पाटकर, कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे जेव्हा जिवाचं रान करतात तेव्हाच जगाच्या मारीचीकरणास वेसण घातली जाते. या जगात विवेक जागा राहतो तो काळापुढे पाहणारी काही माणसं, संस्था, चळवळी असतात म्हणून! पैसा परमेश्वर नव्हे. अन्यायाच्या राज्याचाही अंत असतो. तुम्हास सर्वकाळ सर्वांना फसवता येत नाही. सारखं जीवन वास्तव साहित्य, कला, संगीत लक्षात आणून देतं. म्हणून माणसाचा मारीच होऊ द्यायचा नसेल तर यंत्रांची घरघर चालू ठेवत सतारीचा झंकार ऐकण्याची व नृत्यनाटकं पाहण्याची उसंत माणसांनी जपली पाहिजे.

***

जाणिवांची आरास/१०६