पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 (५) अतिरिक्त मूल्य
 मार्क्सवादाची गेल्या शतकातील पीछेहाट ही प्रामुख्याने त्या विचारसरणीतील अतिरिक्त मूल्याच्या चुकीच्या सिद्धांतामुळे झाली आहे हा विचार शेतकरी संघटनेने तपशीलवार मांडलेला आहे. पुढील शतकांचे काही सांगता येणार नाही, पण आजपर्यंतच्या इतिहासात भांडवलनिर्मिती ही कामगारांच्या श्रमशक्तीपेक्षा शेतीतील श्रमशक्ती आणि असमान विनिमय यामुळे झाली हे स्पष्ट आहे. भांडवलदाराने कामगारांचे शोषण केले एवढ्याच कारणास्तव केवळ कामगाराच्या स्त्रीला तिच्या नवऱ्याची ताबेदारी पत्करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. कामगारांच्या वेतनाच्या हिशोबातील फेरफारीनेच शोषणाची चाके फिरत असती तर स्त्रियांना चार भिंतींच्या आत दुय्यम दर्जा स्वीकारण्याची सक्ती झालीच नसती. पुरुषांना आपली खासगी मालमत्ता आपल्याच वारसाकडे जावी अशी इच्छा उत्पन्न झाली म्हणून हजारो वर्षे समान हक्क बजावणाऱ्या स्त्रियांना विनातक्रार बंधने स्वीकारण्याची गरजही पडली नसती.
 मातृसत्ताक किंवा स्त्री-वर्चस्व असलेल्या समाजांतील स्त्रिया केवळ पुरुषांच्या हाती वरकड निर्मिती झाली आणि शुद्ध वारसाची गरज त्यांना वाटू लागली म्हणून सुखासुखी, विनाप्रतिकार किंवा स्वखुशीने आणि आंनदाने पुरुषसत्ताक व्यवस्था स्वीकारतील हे असंभव आहे. देशभर प्रस्थापित झालेली बौद्धांची राजकीय आणि धार्मिक सत्ता शंकराचार्यांनी केवळ वादविवादाने काही वर्षांतच समूळ नष्ट करून टाकली, या भाकडकथेइतकेच हे असंभाव्य. किंवा गुणक्रमविभागशः चातुवर्ण्यकर्त्याने व्यवस्था तयार केली आणि अंत्यवर्णीयांनी ती विनातक्रार मान्य केली असे समजण्याइतके ते बाष्कळ आहे.
 अश्या तऱ्हेची उलथापालथ शांततामय रीतीने मतपरिवर्तनाने, परस्पर सौहार्दाने घडून येत नाही. रूप एवढे बदलण्यासाठी सगळी वस्तूच वितळवून टाकण्याइतक्या धगीची भट्टी आणि मूस असावीच लागले. कोठेतरी ताकदीचा, अगदी पाशवी ताकदीचा, सैन्याचा, शस्त्रांचा उपयोग निर्णायक पद्धतीने घडला असला पाहिजे. वरकड उत्पादनाच्या पहिल्या उपयोगात अवजारांबरोबर हत्यारेही तयार झाली. या हत्यारांचा उपयोग पुरुषांनी एका काळी स्त्रियांविरुद्ध केला असेल हे असंभाव्य नाही, पण ते पुरुषांच्याच हितसंबंधांना हानिकारक आणि मारक ठरले असते. अगदी स्त्रियांनासुद्धा निसर्गसिद्ध वाटावी अशी पुरुषप्रधान कुटुंबरचना केवळ पाशवी बळाच्या जोरावर प्रस्थापित करता आली नसती. सुप्त प्रतिकाराच्या ठिणग्या दीर्घकाळपर्यंत धुमसत राहिल्या असत्या.

 स्त्रियांच्या दास्याचे मार्क्सवादी विश्लेषण हे अपुरे आहे. असह्य अशी

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ६०