नव्या शेतकरी आंदोलनाचा खरा अर्थच हा आहे. त्याशिवाय गेल्या चाळीस वर्षांत निदान जागतिक महायुद्ध तरी घडलेले नाही आणि शेवटी शक्तीबळाला महत्त्व न देणारे नवे तंत्रज्ञान उदयाला येत आहे. स्त्रियांच्या पुनरुत्थानांचा काळ आल्याची ही सर्व शुभचिन्हे आहेत.
परंतु स्त्रियांनी जागृत होऊन आणि संघटितपणे या अनुकूल परिस्थितीच्या संगमाचा फायदा घेऊन प्रचलित व्यवस्थेला निर्णायक धक्का दिला नाही तर ही अनुकूल संधीही वाया दवडल्यासारखे होईल. स्त्रियांना संघटितपणे कष्टकऱ्यांचे हक्क मिळवावे लागतील. तसेच स्त्रीपणाच्या हक्कासाठी झुंझावे लागेल. त्याहीपेक्षा महत्त्वाची आणखी गोष्ट, पीछेहाट होणारे लुटारू जाती, धर्म, भाषा आदी क्षुद्रवादांचे झेंडे उभारून पुन्हा एकदा हिंसाचाराचा डोंब भडकवण्याचा प्रयत्न करतील. याबद्दल स्त्रियांनी विशेष जागरूक राहणे आवश्यक आहे.
स्त्रियांची सध्याची दुरवस्था फार जुनी आहे, या स्थितीला पर्याय नाही असे स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही शिक्षणाने, उदाहरणाने, संस्कृतीने आणि राजकारणाने पटवून देण्यात आले आहे.
आपण माणसे आहोत आणि माणसाप्रमाणेच सन्मानाने व स्वतंत्रपणे जगू शकतो हे स्त्रियांना सांगावे लागेल आणि पटवून द्यावे लागेल. या दिशेने पहिले पाऊल म्हणून-
आम्ही प्रतिज्ञा घेतो की,
आम्ही यापुढे स्त्रियांना कधीही कनिष्ठ समजणार नाही. विशेषतः गर्भ स्त्री-बालकाचा आहे यास्तव त्याला जन्माचा हक्क नाकारणार नाही;
मुलगी आहे म्हणून लालनपालन, वात्सल्य, शुश्रूषा आणि शिक्षण यात कमी करणार नाही;
स्त्रियांना मालमत्तेमधील त्यांची वाटणी, गुणविकासाला वाव आणि स्वातंत्र्य मिळण्याआड येणार नाही;
तसेच मुलींचे शिक्षण आणि विवाह यांबद्दलच्या कायद्यांचे पूर्णपणे परिपालन करू;
सासुरवाशिणींना घरच्या लेकींप्रमाणे वागवू आणि माहेरवाशिणींना आमचा आधार कायम वाटेल अशा वागू. विधवा, घटस्फोटिता व परित्यक्ता आणि विशेषतः अत्याचारांना बळी पडलेल्या स्त्रियांना कमी लेखणार नाही;
स्त्रियांचे शृंगार-ललित रूपच प्रकाशात आणून त्यांची नटवी, उपभोग्य वस्तूची हिडीस प्रतिमा मांडणार नाही आणि मांडू देणार नाही.
■ ■