पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना.
--****--
संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरे ।
काय म्यां पामरें जाणावें हें ॥

तुकाराम.


श्रीमद्भगवद्गीतेवर अनेक संस्कृत भाष्यें, टिका किंवा प्राकृत भाषांतरे अगर विस्तृत सर्वमान्य निरूपणें असतां, हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचें कारण काय हें जरी ग्रंथारंभीच सांगितले आहे, तरी ग्रंथामधील प्रतिपाद्य विषयाच्या विवेचनांत सांगता न येणाऱ्या काही गोष्टींचा खुलासा करण्यास प्रस्तावनेखेरीज दुसरा मार्ग नाहीं. पैकीं पहिली गोष्ट स्वतः ग्रंथकारासंबंधी होय. भगवद्गीतेचा व आमचा प्रथम परिचय होऊन आज सुमारे त्रेचाळीस वर्षे झाली. इसवी सन १८७२ साली वडील शेवटच्या दुखण्यानें आजारी असतां भगवद्गीतेवरील-भाषा-विवृति नांवाची प्राकृत टीका त्यांस वाचून दाखविण्याचें काम आमचेकडे आलें होतें. तेव्हां म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी गीतेचा भावार्थ पूर्णपणें लक्षांत येणें शक्य नव्हतें. तथापि लहान वयांत मनावर घडणारे संस्कार टिकाऊ असल्यामुळेच भगवद्गीतेबद्दल तेव्हां उत्पन्न झालेली आवड कायम राहून संस्कृतचा व इंग्रजीचा पुढें अधिक अभ्यास झाल्यावर गीतेवरील संस्कृत भाष्यें व दुसऱ्या टीका आणि इंग्रजींत व मराठींत अनेक पंडितांनी केलेलीं विवेचनेंहि वेळोवेळीं वाचण्यांत आलीं. परंतु स्वकीयांबरोबर युद्ध करणें हें मोठें कुकर्म म्हणून खिन्न झालेल्या अर्जुनास त्याच युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेल्या गीतेंत ब्रह्मज्ञानानें किंवा भक्तीनें मोक्ष कसा मिळवावा याचें, म्हणजे नुस्त्या मोक्षमार्गाचें, विवेचन कशाला, ही शंका मनांत येऊन तीच उत्तरोत्तर बळावत चालली. कारण, गीतेवरील कोणत्याहि टिकेंत त्याचें योग्य उत्तर आढळून येईना. आमच्याप्रमाणें दुसऱ्यांना हीच शंका आली असेल, टीकाकारांनी दिलेलें उत्तर समाधानकारक न वाटलें तरी त्याखेरीज दुसरें उत्तर सुचत नाहीसें होतें. म्हणून सर्व टीका व भाष्यें बाजूला ठेवून नुस्त्या गीतेचीच स्वतंत्र विचारपूर्वक आम्ही अनेक पारायणें केलीं. तेव्हां टीकाकारांच्या छापेंतून सुटका होऊन मूळ गीता निवृत्तीपर नसून 'कर्मयोग'पर आहे, किंबहुना गीतेंत 'योग' हा एकेरी शब्दच 'कर्मयोग' या अर्थी योजिलेला आहे; असा बोध झाला; व महाभारत, वेदान्तसूत्रें, उपनिषदें आणि वेदान्तशास्त्रावरील इतर संस्कृत व इंग्रजी ग्रंथांच्या अध्ययनानेंहि तेंच मत दृढ होत जाऊन, तें लोकांत प्रसिद्ध