पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
प्रस्तावना

११

गीता सर्वमान्य झाली असती परंतु एवढ्यावरच न थांबतां मोक्ष, भक्ति आणि नीतिधर्म यांमध्यें आधिभौतिक ग्रंथकारांस भासणारा विरोध, किंवा ज्ञान आणि कर्म यांमध्यें संन्यासमार्गीयांचे मतें असणारा विरोधहि खरा नसून ब्रह्मविद्येचें व भक्तीचें जे मूलतत्त्व तेंच नीतीचा व सत्कर्माचाहि पाया आहे असें दाखवून, ज्ञान, संन्यास, कर्म व भक्ति यांच्या योग्य मिलाफानें इहलोकी आयुष्यक्रमणाचा कोणता मार्ग मनुष्यानें पत्करावा याचाहि गीतेंत निर्णय केला आहे. गीताग्रंथ याप्रमाणें प्राधान्येंकरून कर्मयोगाचा आहे म्हणूनच "ब्रह्मविद्यांतर्गत (कर्म-) योगशास्त्र" या नांवानें सर्व वैदिक ग्रंथात त्याला अग्रस्थान प्राप्त झालें आहे. "गीता सुगीता कर्तव्या किमन्येः शास्त्रविस्तरैः" - एकल्या गीतेंचें पुरें अध्ययन केलें म्हणजे बस्स आहे; बाकीच्या शास्त्रांचा फोलकट पसारा काय करावयाचा? - असे म्हणतात तें कांही खोटें नाहीं; आणि म्हणूनच हिंदुधर्म व नीतिशास्त्र यांच्या मूलतत्वांची ज्यांस ओळख करून घ्यावयाची असेल त्यांनी या अपूर्व ग्रंथाचें प्रथम अध्ययन करावें असें आमचें त्यांस सविनय पण आग्रहपूर्वक सांगणे आहे. कारण सांख्य, न्याय, मीमांसा, उपनिषदें, वेदान्त वगैरे क्षराक्षरसृष्टीचा व क्षेत्रक्षेत्रज्ञज्ञानाचा विचार करणारी प्राचीन शास्त्रें तत्काली शक्य तेवढ्या पूर्णावस्थेस आल्यावर वैदिक धर्मास ज्ञानमूलक भक्तिप्रधान व कर्मयोगपर असें जे अखेर स्वरूप आलें, व हल्लीं प्रचलित असलेल्या वैदिक धर्माचें मूल आहे, तेंच गीतेंत प्रतिपादिलेलें असल्यामुळें, संक्षेपाने पण निःसंदिग्ध रीतीने सांप्रतच्या हिंदुधर्माचीं तत्त्वें समजावून देणारा गीतेसारखा दुसरा ग्रंथच संस्कृत वाङ्मयांत[टंकनभेद] नाहीं म्हटलें तरी चालेल.

गीतारहस्यांतील विवेचनाचा सामान्य रोख यावरून वाचकाच्या लक्षांत येईल. गीतवर पहिल्या टींका कर्मयोगपर असाव्या असें गीतेवरील शांकरभाष्याच्या तिसरे अध्यायाचे आरंभी या टीकाकारांच्या अभिप्रायांचा जो उल्लेख आहे त्यावरून दिसून येत. या टीका आता उपलब्ध नाहींत; म्हणून गीतेचें कर्मयोगपर व तुलनात्मक हे पाहिलेंच विवेचन आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. यांत कांही श्लोकांचे[टंकनभेद] अर्थ हल्लीच्या टीकांतून दिलेल्या अर्थाहून भिन्न असून, मराठींत पूर्वी कोठेंच सविस्तर वर्णिले नाहींत असे दुसरे पुष्कळ विषयहि सांगावे लागले आहेत. हे विषय व त्यांची उपपत्ति संक्षेपानेंच पण होईल तितक्या स्पष्ट व सुबोध रीतीनें सांगण्याचा आम्हीं प्रयत्न केला आहे; आणि द्विरुक्ति झाली तरीहि त्याची पर्वा न ठेवितां ज्या शब्दांचे अर्थ मराठीत अद्याप रूढ झालेले नाहींत त्यांचे पर्यायशब्द त्याना जोडूनच पुष्कळ ठिकाणीं मुद्दाम दिलेले असून, शिवाय या विषयांतील प्रमुख प्रमुख सिद्धान्त जागोजाग सारांशरूपानें उपपादनापासून निराळे काढून दाख-