पान:गांव-गाडा.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वतन-वेतन.
-----

 गांव-मुकादमानीचा परिणाम जनतेच्या दानतीवर फार अनिष्ट झाला. इसवी सन १८१८ सालीं क्याप्टन् ब्रिग्ज ह्यांनी खानदेशाचा ताबा घेतल्यावर तेथील लोकस्थितीचे जे निरूपण केले आहे, ते इतत्रही लागू पडण्यासारखे आहे. ते म्हणतात-अगदी साध्या गोष्टींतसुद्धा खरें काय आहे, हे लोकांच्या तोंडून काढून घेण्यास यातायात पडते. लौकर दाद मिळविण्याच्या आशेने ते नेहमी राईचा पर्वत करितात. लांचलुचपती व एकमेकाशी अन्यायाचे वर्तन ह्यांचे प्रमाण इतके वाढलें होतें की ते सांगू गेल्यास कोणी खरेंसुद्धां मानणार नाही. धाकटे घराण्यांत अवश्य तितकी धूर्तता आणेि रोकड मात्र पाहिजे, की त्याने वडील घराण्याच्या तोंडाला पाने पुसून त्याची मालमत्ता सरकारांतून आपल्याकडे ओढलीच समजा. ह्यामुळे जिकडे तिकडे गृहकलहाचा वणवा पेटून सरकारी दप्तरांतसुद्धां बनावट दस्तैवज घुसले, आणि अस्सल खरे दस्तैवज मिळविण्यासाठी मारामारी व ठोकाठोकी माजून राहिली. शेतकऱ्यांच्या अनाथ स्थितीला तोड उरली नाही,असें झालें. मामलेदार, लष्करी लोक, सावकार, पाटील-कुळकर्णी, देशमुख-देशपांड्ये ह्यांना मात्र अकरावा आला. दुर्बल-प्रबलांच्या झगड्यांत लबाडी आणि कावेबाजपणा हीच काय ती हत्यारे दुर्बलांला कामास येतात. लोक जात्या लुच्चे किंवा पापपुण्याला न मानणारे असतात असे नाही. पण जुलमांतून कसे बसें निसटून जाण्याला त्यांना असत्याचा अवलंब करणे प्राप्त होते.

 अशा भूमीत इंग्रजी राजसत्तेने आपला नांगर टाकला व जसजशी व्यवस्था लागत गेली तसतसे सुभे,सरकार-परगणे वगैरे राज्यविभाग मोडले. देशमुख, देशपांड्ये, हावलदार वगैरे महाल जमेदारांचे देव्हारे मराठशाहीत डगमगू लागले; ते इंग्रजीत सन १८६३ साली पार बसले. पहिल्या पहिल्याने देशमुख-देशपांड्यांना वसूली कामगार समजत,व तें काम ते स्वतः