पान:गांव-गाडा.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वृत्ति.      २५


त्रासदायक व ओंगळ कामें भिन्न भिन्न जातींतल्या मिश्र शरीरसंबंधाच्या अपत्यांनी व नवीन धर्मानुयायांनी पत्करली. वर सांगितलेल्या व त्यांसारख्या अनेक कारणांमुळे जातींची संख्या व कोंडी बेसुमार वाढली, आणि जातिभेदाची मुळेपाळे लोकाचारांत इतकी खोल गेली की, जातिभेदाचा नायनाट करण्यासाठी अवतीर्ण झालेल्या महंमदी व ख्रिस्ती धर्मांना सुद्धा ह्या कामांत तोंड फिरवावे लागले आहे. लाखों हिंदूंनी महमदी व ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली तरी त्यांच्या गळ्यांतलें जातिभेदाचे लोढणे सुटलें नाही. आतार, मण्यार, झारेकरी, कंजार, तेली, धोबी, मोमीन, तांबोळी, कसई, मदारी, दरवेशी, बंदरवाले, कसबी, कटई, हलालखोर वगैरे कनिष्ठ गणलेले धंदे करणाऱ्या मुसलमान जातींचा व वरिष्ठ जातींच्या मुसलमानांचा बेटीव्यवहार होत नाही. ब्राह्मण ख्रिस्ती, साळी ख्रिस्ती, महार ख्रिस्ती, मांग ख्रिस्ती असले भेद लग्नसंबंधांत हिंदी ख्रिस्ती पाळतात. समाजसुधारकांना जरी पुष्कळसे जातिभेद अनवश्यक दिसतात तरी त्यांना फांटा देणें अनेक वर्षांच्या वहिवाटीमुळे दुर्घट झाले आहे. अनेक जातींत अनाचार, दुराचार व दोष ह्यांना जातिधर्माचे स्वरूप आल्यामुळे ज्या त्या जातीला व एकंदर समाजाला त्यांतला वावगा प्रकार दिसेनासा झाला आहे. तसेंच जातीजातीत-आचारविचारांचे अंतर कसें व किती दुरावलें आहे, आणि जातिधर्मामुळे जातिभेदाचा कोट दुर्भेद्य होऊन पर्वताच्या तुटलेल्या कड्याप्रमाणे हिंदु समाजांतल्या जाती एकमेकांपासून बहुतांशी कशा सुटावल्या आहेत हे गुन्हेगार व व्यभिचारी जातींवरून चांगले स्पष्ट होतें.

 प्रत्येक समाजाला असे वाटत असते की, आपण स्वयंपूर्ण असावें व कोणत्याही गोष्टींत दुसऱ्याच्या ओंजळीनें पाणी पिण्याची पाळी आपणावर येऊ नये. त्यांतून हिंदु समाजांतील जाती व पोटजाती एकमेकांपासून बहुतेक बाबतींत अलग झाल्यामुळे स्वयंपूर्ण असण्याची आवश्यकता त्यांना विशेष भासू लागली. जातिपरत्वें जरी सरकारी, खासगी