पान:गांव-गाडा.pdf/291

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७०      गांव-गाडा.

सुरेख चालतो, अशी खातरजमा झाल्याशिवाय शाळांत ब्राह्मणेतरांच्या मुलांची गर्दी होणें व प्राथमिकापेक्षां दुय्यम प्रतीचेंच शिक्षण जास्त फैलावतें ही तक्रार दूर होणें दुर्घट दिसतें. सन १८९१ तें १९११ पर्यंत दुय्यम शिक्षणाच्या शाळांतील विद्यार्थी दुपटीहून वाढले, पण प्राथमिक शाळांतील काय ते शेंकडा ६७ नींच वाढले. मिशनऱ्यांच्या गांवोगांव फुकट शुाळा व त्यांमधील परोपरीची आकर्षकें असूनही त्यांनीं हातीं धरलेल्या निकृष्ट वर्गात शिक्षणाचा प्रसार होत नाहीं ह्याचें वर्म तरी हेंच आहे. लिहिण्यावाचण्याला 'तिसरा डोळा ' म्हणतात. दोन जाऊन जर तिसरा येत असला तर तो हवा असें कोणीही म्हणणार नाही. पोटाची दोन कामें येऊन जर साक्षरतेचा लाभ झाला तर खरें कल्याण आहे. तेव्हां प्राथमिक शाळेचा तरी अभ्यासक्रम व वेळ असा ठेविला पाहिजे कीं, विद्यार्थ्यांना लिहिणें शिकून आपला पिढीजाद किंवा दुसरा धंदा हस्तगत करण्याला सवड सांपडेल. ओबडधोबड आऊतकाठी तयार किंवा दुरुस्त करण्यासाठीं कुणब्याला आपल्या उत्पन्नाच्या चौथ्या वांटयावर बलुतें द्यावें लागतें. ह्यास्तव प्राथमिक शाळांतून जर सुतारकी, लोहारकी, चांभारकी वगैरे विषयांचें शिक्षण देण्याची सोय झाली तर शाळेत मुलें घातल्यापासून फायदा आहे असें लोकांच्या अनुभवाला फार थोड्या अवधींत येईल. शाळेत धंदेशिक्षण घेऊन जे कुणबी बाहेर पडतील ते आपलीं बलुत-कामें घरच्या घरीं करतील. अशा रीतीनें त्यांची कामें वेळच्या वेळीं होऊन त्यांसाठीं खर्च होणारा पैसा व वेळ वांचला तर इतरांनाही आपलीं मुळे शाळेत घालण्याची उमेद येईल. मि. कीटिंग साहेबांच्या अंदाजाप्रमाणें दक्षिणेंतील शेतकऱ्यांना शेतकाम फार तर सहा महिने पुरतें. तर मग शेतकाम संभाळून त्यांना कारू-नारूंचें काम करण्याला पुष्कळ फुरसत आहे. तिच्यांत त्यांनीं कांहीं आऊतें केलीं तर तों त्यांना विकताही येतील, आणि आपल्या उत्पन्नांत भर टाकतां येईल. सध्यां जातिधर्माप्रमाणें कुणबिकीच्या आउतपैकी एक एक जातीचा कारू करतो, दुसरें दुसरीचा, एवढेंच नव्हे तर सनगाचे वेगवेगळाले भाग वेग-