पान:गांव-गाडा.pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३६
गांव-गाडा.

आणि खडकी ऊर्फ औरंगाबाद शहर वसविणारा मलिकंबर ह्याने दक्षिणची शेतवार पाहणी व मोजणी करून प्रतवारी बसविली, आणि जमिनीच्या उत्पन्नाप्रमाणे / हिस्सा घांसदाण्याच्या रूपानें वसूल घेण्याचा खुद्द गांवांशी ठराव केला, व वसुलाची जबाबदारी पाटलांवर टाकली. इ. सन १६१४ च्या पुढे त्याने काही ठिकाणी दरसालच्या वास्तविक उत्पन्नाच्या मानाने / नगदी वसूल घेण्याचा प्रघात सुरू कला. त्याने प्राचीन ग्रामसंस्थांचे पुनरुज्जीवन केलें, कुणब्यांना मिरासपत्रे देऊन म्हणजे जमिनीचे मालक बनवून त्यांना जमिनीच्या खरेदी विक्रीचे हक्क दिले, आणि पाटीलकुलकर्णी व इतर ग्रामाधिकार आणि बलुतदार ह्यांची वतने मिरास म्हणजे वंशपरंपरेची करून दिली. त्याने गांवाला पड जमिनीतून वनचराई, गायराने काढून दिला, आणि उरली जमीन ती “ गांवसंबंधी” किंवा “ गांव वर्दळ " म्हणून गांवाच्या दिमतीला लावून दिली. सरकारसाऱ्याचा ठराव गांववार - असल्यामुळे त्याची कुळवार फाळणी पाटील करी. ही वसूलपध्दतीची सुधारणा “ मालिकंबरीतह" ह्या नावाने प्रसिद्ध आहे. कुणब्याचा किबहुना कुणब्याअडाण्यांचा काळीशी एकजीव केल्यावांचून सरकारसाऱ्याची शाश्वती नाही, हे तत्त्व मलिकंबरनें पूर्णपणे हृदयांत वागविलें; आणि अझूनही लोक त्याचे गुण आठवितात. ह्याप्रमाणे तनख्यानं कुणब्याकडे किंवा गांवाकडे असलेल्या जमिनीस " मिरासी” व तिचा भोगवटा घेणारास मिरासदार, थळकरी, वतनदार, म्हणत. मेलेल्या मनुष्याची जी मिळकत त्याच्या वारसाला प्राप्त होते तिला अरबी भाषेंत "मिरास" म्हणतात. वारसहक्काने पिढ्यानपिढ्या अबाधितपणे राहाणाऱ्या जमिनीला “मिरासी" म्हणत. मिरासीच्या कोंकणी भांवडांना 'सुटी" व “धारा" म्हणतात. मिरासीखेरीज जी कीर्दसार जमीन सरकारच्या वहिवाटीला राही, तिला खालसा म्हणत. खालसा किंवा सरकारी जमिन सरकार मन मानेल त्याला काही मुदतीपर्यंत कौलाने देई. कौलाने जमिन वाहणाराला उपरी ह्मणत.