पान:गांव-गाडा.pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६२      गाव-गाडा.

गाड्याचा माग फांसाट्याने तरी काढला पाहिजे, आणि कोणी आला तर त्याला विन्मुख न परतवितां घांसांतून घांस काढून दिला पाहिजे; असल्या भोळ्याची तळी भरली पाहिजे. ज्याने त्याने आंग झिजवावें व खावें, हा ईश्वरी संकेत आहे. चोरट्या, भिकार व इराण्यांसारख्या दंडेल जाती ह्यांना गांवकऱ्यांनी निर्भिडपणाने एक मुसंडीने तोंड द्यावें, आणि ज्याचा माल त्याचे हाल होऊ देऊ नयेत. निश्चयाचे बळ असल्यावर चार पांच वर्षांत त्यांना फळ मिळेल, आणि त्यांचा हात थोडा फार तरी चालेल. गोसावी, बैरागी, फकीर, मानभाव, वारकरी, वासुदेव, पांगुळ, जोशी, तिरमल, देवीचे नाना पंथांचे भगत, खोटे-नाटे आंधळेपांगळे, विकल वगैरे जे बऱ्हाणी अशिक्षित भिक्षुक असतील, त्यांना मुळींच भिक्षा घालू नये. कोणी उपाशींच मरूं लागला तर ज्याच्या त्याच्या माफक काम देऊन पराकाष्ठा तर सढळ रोजंदारी द्यावी. फिरस्त्यांपैकी जे हुन्नरी असतील त्यांच्या कामाबद्दल किंवा मालाबद्दल रोकड मोबदला द्यावा, धान्य भाकरी वगैरे देऊ नये; कारण त्यांत श्रम व कसर फार जाते. त्यांचे सर्व काम गांवचे कारूनारू व दुकानें ह्यांजकडून भागण्यासारखे आहे, व त्यांच्या फेऱ्यांचे काही प्रयोजन उरलें नाही. पण त्यांना येण्याजाण्याची मनाई करणार कोण ? ह्यासाठी स्वस्त असेल तरच ह्या बिछाइत्यांशी सौदा करावा, आणि काही झाले तरी फिरस्त्यांनी व त्यांच्या जनावरांनी कोणालाही उपसर्ग लावतां कामा नये.

 पांखरा-जनावरांसंबंधानेंही ज्या भोळवट धर्मसमजुती आहेत, त्यांना खो मिळाला पाहिजे. हौसेसाठी, उपयुक्ततेसाठी अगर भूतदयेसाठी पांखरें जनावरें पोसणे वेगळे; आणि धर्मभयाने त्यांना पोसणे किंवा जीवदान देणे वेगळे. दुसऱ्या प्रकारांत शिरजोरपणा वाढून लफंगपणास उत्तेजन मिळतें. जान्या ( देवाच्या नावाने सोडलेल्या ) गाई, पोळ, टोणगे. बोकड इतके उन्मत्त होतात की ते शेतांत घुसून पिकांची अतोनात नासाडी करतात; बाजारांत चारा, दाणा, फळे वाटेल तितकी खातात, व माणसाजनावरांच्या अंगावर जाऊन त्यांना जायबंदी करतात, नव्हे वेळेवर ठार करतात. चांगली जोपें निपजण्याकरितां रगदार