पान:गांव-गाडा.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फसगत.      २२३


विचार केला. आता त्यांतील वतनदारांच्या हितानहिताचा त्यांच्या त्यांच्या पुरता विचार करूं. खेड्यांतले अघाडीचे वतनदार पाटीलकुळकर्णी. खानदेशांत अशी म्हण आहे की, 'शेतांत नसावा कुंदा आणि गांवांत नसावा निसुंदा' ( कुळकर्णी ). शेतांत कुंदा कालवला म्हणजे जसें पीक वाढत नाही तसा गांवांत कुळकर्णी राहिला म्हणजे लोक सधन होत नाहीत. 'कर्त्याची किंवा करील त्याची पाटिलकी आणि भोगील त्याची संपदा' ही ह्मण सर्वत्र प्रचारांत आहे. 'पाटलाची घोडी' हा भाषणसंप्रदायही बराच रूढ आहे, व त्याचा अर्थ असा आहे की, पाटलाच्या गोठ्यांत गवताची काडी नसतां घोडीवर मात्र लिंबू ठरत नाही; म्हणजे ती दुसऱ्याच्या शेतांत फुकट चरते. ही लोकांमध्ये पाटीलकुळकर्ण्यांची योग्यता! ह्या वरील म्हणींना अपवाद असतील; पण वतनदार पाटीलकुळकर्ण्यांच्या मुशाहिऱ्याच्या सध्यांच्या स्थितीत कानांत तुळशीपत्र घालून राहणें असंभाव्य दिसते. वाढत्या महागाईत मुशाहिऱ्यामध्ये प्रपंच भागला नाही, तर कोठे तरी पैसे मारलेच पाहिजेत. स्वराज्यांत राजरोष पैसे खाण्याची रूढि पडल्यामळे पैसे खाऊन पचविण्यांत मोठी शहामत व भूषण मानीत. पैसे खाल्ल्याबद्दल किंवा दुसऱ्याच्या डोळ्यांत धूळ टाकल्याबद्दल एकमेकांना वतनदार सहसा दोष देत नाहीत; न खाणारांना मात्र शेळीचे गलूल (अजागळ) म्हणून हांसतात. ज्याचे नुकसान होतें तो अगर त्याचे आप्त मात्र ओरडतील; परंतु नुकसान करणाराला दूषण ठेवणारे खेड्यांत विरळा. तेव्हां परद्रव्यापहारासारख्या पातकाबद्दल साधारण लोकांना काही वाटू नये, व तें कसब गणले जावे हा नैतिक अधःपात कमी आहे काय ? 'जमेदारकी नरमाई,' गुरमाई उपयोगी नाहीं असेंही म्हणतात. मिधेपणा असला म्हणजे बाणेदार वर्तन राहत नाही. खेड्यांत गेले असतां पाटीलकुळकर्णी तर हांजी हांजी करणारे दिसतातच, पण त्यांच्या लहान लहान मुलांत सुद्धां पाणी दिसून येत नाही. त्यांच्या अंगांतही फाजील लवचीकपणा बाणतो. जनहिताच्या दृष्टीने स्वाभिमान नाहीसा होणे बरे नाही. शिक्षणाची सोय खेड्यांत