पान:गांव-गाडा.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फसगत.      २१३

ओढ नसतां केवळ उपजत अंगस्वभावाने ज्यांनी गुण संपादन करून कीर्ति मिळविली असे हरीचे लाल वतनदार कसबी लोकांमध्ये फार थोडे निघाले. आम्हांला कोठे जावयाचे आहे राजधानीत? वडिलांची वाकळ खाऊन खेड्यांत भरावयाचे, वडील काय कमी शहाणे होते ? जेवढी शक्य तेवढी चतुराई व सुधारणा त्यांनी करून ठेविली आहे, त्यांनी पोटापुरतें शिकविलें तेवढें बस्स आहे, असे म्हणणारे बहुतेक निघाले व निघतात. त्यांना वाडवडिलांचें चातुर्यसुद्धा जतन करण्याची मारामार पडली, तर नवीन कोठून येणार ? त्यामुळे झाले काय की आमची शेती, तिची आउतें, आमचे सामानसुमान आणि कसबी वतनदारांची हत्यारे ही हजारों वर्ष जशीच्या तशी राहिलीं, किंबहुना ती एकसारखी कमकस होत गेली; पण त्यात सुधारणा म्हणून झाली नाही हे मात्र खात्रीने सांगता येईल. ही अधोगति येथेच थांबती तरी बरें होतें. आमच्यांत सुधारणा झाली नाही इतकेच नव्हे तर दुसऱ्यांनी केलेली सुधारणा हस्तगत करण्याची ही मारामार हाऊन बसली. सुधारलेले नांगर, पंप, शेतकरी कां घेत नाहीत व श्रीमंत होत नाहीत ह्या गोष्टीचा आम्ही डोके खाजवून खाजवून विचार करतो. पैसा कोणाला नको आहे! पण शेतकरी विचार करतात की, ह्या सनंगांचा खिळा निघाला तर तो बसविण्याची पात्रता गांवच्या वतनदार मिस्तरीत नाहीं; तेव्हां उठल्या बसल्या कोठे जा मुंबईस ? त्यांत असली पात्रता नसली तरी त्याचे बलुते कमी पडत नाही. मग त्याने तरी ती अंगी आणण्याची यातायात कां करावी ? ज्या शक्तीचा किंवा अवयवांचा प्राणी उपयोग करीत नाहीं ता शक्ति व ते अवयव केवळ निरुपयोगाने लोप पावतात, असा सिद्धांत आहे, तेव्हां हजारों वर्षे जर आम्ही आपली कल्पना चालविली नाही, तर ती लुप्त झाली; आणि आमच्यांमध्ये नवीन शोध, क्लुुप्त्या, योजना बहुतकाळ झाल्या नाहीत व होत नाहीत, आणि दुसऱ्याने केलेल्या सुधारणांचं आकलन व ग्रहण आमचेकडून होत नाही, ह्यांत नवल मानण्यासारखें कांहीं नाहीं. घाण्याभोवती जसा डोळे बांधून बैल एकसारखा फिरतो, त्याप्रमाणे जातकसबी लोक वडिलांनी दाखविलेल्या वाटांनीं चालत