पान:गांव-गाडा.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७४      गांव-गाडा.

देऊन झाडे लावण्यास उत्तेजन देत आहे. चाऱ्याचा संचय कसा करावा हे कोडें उकलण्यांत सरकार व लोक गुंतले आहेत. परंतु जोंपर्यंत कुणब्याच्या मागचे हे भुंगे तोडून काढले नाहीत, तोपर्यंत सरकारच्या व लोकांच्या प्रयत्नाला ह्या कामी यश येणार नाही. यावें कसे ? जमिनीच्या बाहेर अंकुर येण्याचा उशीर की तो खुडलाच. मना करावें तर जाळ सुद्धी, मार जनावर असल्या नुकसानीला पाचारण करावें. जोपर्यंत अशी स्थिति आहे तोपर्यंत कुणब्याने तरी काय करावे ? आणि चाऱ्याचा व जनावरांचा संग्रह कसा करावा व त्यांचा विमा उतरण्याला तरी कोणी पुढे यावें ! आतां काळी आंखली आहे, आणि वाटेल तेथें रान काढण्याला कुणब्याला मार्ग नाही. वांटणीमुळे शेताच्या चिंधोट्या चिंधोट्या झालेल्या आहेत. तेव्हां सबंध दुनियेच्या पोषणाचे ओझें कुणब्याला झेंपेनासे झाले आहे. आणि “ एक बळी हजार छळी” असें तो पाण्याच्या दर घोटास कुरकुरतो. पाटील-कुळकण्यांचे ऐन जिनसी हक्क वजा केले, तसे महारजागल्यांचे सरकारने केले नाहीत. त्यामुळे कुणब्यांना सबंध महारवाडा, रामोसवाडा, भिलाटी, कोळवण, मांगवण पोसावे लागते. आम्ही सरकारचे काम करितों असें, म्हणून कुणब्याच्या बोकांडी बसून हे लोक त्याला लोळवितात. तसेच दरसाल हजारों भिकार सहपरिवार कुणब्याला पोसावे लागते. समुद्र, जंगल सुटें होतें, हत्यारांची मनाई नव्हती, तेव्हां हे लोक व भटक्ये जंगलावर, शिकारीवर व मिठावर थोडे फार पोट काढीत आणि पिकांना व ढोरांना उपद्रव करणाऱ्या पाखराजनावरांचा संहार करीत. जंगलकाळी आंखून कुणब्याला डांभले त्याच वेळेला ह्या सर्वांना डांभून टाकावयास पाहिजे होते. तसे न झाल्याने कुणब्याच्या आयातीला मात्र बांध पडला; परंतु निर्गत कायम-नव्हे-जास्त वाढली. कुणबी म्हणत असतो की, पृथ्वीचा एक कोपरा पिकला आणि तीन खकाण राहिले म्हणजे सगळ्या भोरड्या पिकलेल्या भागावर आदळतात. तशी त्याची गति झाली आहे, आणि माणसांजनावरांची सर्व खाती-तोंडे शेतांवर येऊन पडली आहेत.