पान:गांव-गाडा.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२      गांव-गाडा.


इतरांनीही वाटेल तसा रानपसारा आणि मीठ घ्यावे व कुणब्याच्या पोटांत पोट आणि घांसांत घांस काढावा; परंतु कोणीही—माणूस काय किंवा जनावर काय-उपाशी मरूं नये अशी व्यवस्था ठरली. अव्वल इंग्रजीतही काळी फार व कुणबी थोडा अशी स्थिति होती, आणि हे आंधळं गारूड पूर्वीप्रमाणेच चालले होते. जमिनीची पैमाष झाली, मीठखाते निघाले आणि सरकाराने जंगल ताब्यात घेतले, तेव्हांपासूनं कुणब्याचे व त्याजवर अवलंबून राहणाऱ्या शेकडों जंगली व भटकणाऱ्या जातींचे हात पाय आंखडले. प्रपंच भागत नाही म्हणून वाटेल तेथे फुकटफाकट किंवा वेळेला पैसे देऊनही वहीत करीन; आऊतकाठी, कुपाटी, राब, ताली, विहिरी, घरे वगैरेसाठी जंगलांतून लांकूडफाटी, ढाळ्या, पाचोळा, गाटागोटा बिनपरवानगीनें अगर कर न देतां आणीन; किंवा मर्जीप्रमाणे जंगलांत गुरे चारीन असे कुणबी आज म्हणेल तर चालत नाही. समुद्रकाठच्या किंवा जंगली जमाती म्हणतील की, मीठ किंवा रानमाल वाटेल तसा विकून पैसे करूं तर सोय नाही. पाश्चात्य कलावृद्धीमुळे पुरातन धंदे बहुतेक मोडले आणि जो उठला तो कुणबी बनला. शिवाय प्रजाही वाढली. त्यामुळे लागण करण्याजोगी बहुतेक नाकीर्दसार जमीन वहीत झाली आहे. तेव्हां हवी तितकी काळी, खारी आणि मोकळे रान हा जो आमच्या आडमापी कुणबिकीचा अनादि धर तो सुटला.

 समुद्राची व जंगलाची बंदी झाल्यापासून त्यांची सर्व वर्दळ लागण जमिनीवर लोटली. सरपण हजारों वर्ष फुकट मिळत असल्यामुळे त्याच्या खर्चाचा सुमार कोणालाच राहिला नाही. आपल्या धंद्यासाठी व प्रपंचासाठी कुणबी आपापल्या शेतांतली झाडे तोडूं लागले. जळण विकत घेण्याची संवय नसल्यामुळे तमाम गांवकरी कुणब्याजवळून तें मोहबतीने मागून आणूं लागले. झाडे कमी होत होत गेली आणि त्या मानाने नवीन लागवड झाली नाही. त्यामुळे सरपणाला किंमत येऊ लागली. भील, रामोशी, महार, मांग वगैरे