पान:गांव-गाडा.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुणबी.      १७१

राचे आहे. शेणकुराचे मुबलक खत मिळण्याला पुष्कळ लक्ष्मी उर्फ गुरें बाळगली पाहिजेत. ती सर्व शेताच्या मालावर जोगवणे अशक्य. "घरचा चारा आणि रानचा वारा" बरोबर नाहीत असें म्हणतात. इतक्या गुराढोरांना तोंड घालण्याला मोकळे जंगलच पाहिजे. शेतीला कुंपण कांटेरी झुडपांचे असते. ती सर्व वहिती जमिनीत मिळत नाहीत. ती जंगलांतून आणिली पाहिजेत. जंगलाशिवाय पुरेसें सरपण कोठे सांपडणार ? महारांचे काम जमेदारांना जळण पुरविण्याचे होतें, व त्याबद्दल त्यांना भाकर किंवा जेवण मिळे. गुऱ्हाळांत चुलांगणाला महाराने सरपण पुरवावें व त्याबद्दल त्याला ऊस, दोन ढेपा गूळ व शेवटचे आधण मिळते. हे सरपण जर मालकाच्या शेताचेच असते तर महाराचा हक्क इतका मोठा नसता. अर्थात् महारांना काय आणि इतरांना काय जंगलांतून सरपण घेण्याची मनाई नव्हती. वारली, कातकरी वगैरे जंगली जाती ‘जंगलांत जाऊन सरपण, गवत आणणे, जंगलांतील कंदमुळे खाणे' असा आपला धंदा अजून सांगतात. त्याचप्रमाणे आजमितीला पहाडाचे आसपासचे शेतकरी व मजूर आपले घरांतला दाणा वाढला ( संपला ) म्हणजे जंगलांत जातात; व झाडपाला, फळे, कंद आणून खातात. रासमाथ्याला बलुत्येआलुत्ये आणि अठरापगड भिकार हक्क म्हणा की भीक म्हणा मागून आज हजारों वर्षे आपली सालबेगमी करून ठेवीत आहेत. कुणब्याला जर काळी इतकी कमी असती की, तिच्यांतून त्याची स्वत:ची सालबेगमी निघणे दुरापास्त, तर ह्या वहिवाटीला काही तरी आळा घालण्याचा प्रयत्न तो करता. भिकाऱ्यांच्या टोळधाडीमुळे आपल्या पोटावर पाय पडतो असें बलत्याआलुत्यांना आढळते तर निदान ते तरी त्यांना आडवे होते. ह्या सर्व गोष्टींवरून असे स्पष्ट होते की, कुणबी थोडा व काळी फार असल्यामुळे बळीराजानें दुनियेचा भार उचलला. त्याने वाटेल तेथे वाटेल तितकी काळी काढावी व पिकवावी, तिच्यासाठी लागेल तो रानमाल उपसावा आणि हवी तितकी लक्ष्मी बाळगावी,