पान:गांव-गाडा.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुकानदारी.      १५१

देवाच्या किंवा सत्पुरुषाच्या उत्सवानिमित्त यात्रा असली आणि देवालयाचा अधिपति ऐपतदार असला, तर यात्रेला जे दुकानदार येतात त्याना त्याला शिधा दाणाचारा पोंचवावा लागतो, जेवावयास बोलवावें लागतं, आणि त्यांचा कांहीं मान ठरलेला असला तर त्याप्रमाणे नारळ, धोतरजोडा, पागोटे किंवा रोकड देऊन त्यांची मानसंभावना करावी लागते आणि जे वारकरी, गोसावी, बैरागी, साधू, फकीर विकल वगैरे भिक्षुक येतात त्यांचाही ह्याप्रमाणे समाचार घेऊन खेरीज दक्षिणा, तंबाखू, गांजा, अफू, द्यावी लागते; व हे संतही कैफ हक्कानें धर्म म्हणून मागतात. यात्रेचे आधिपत्य सबंध गांवाकडे असले, तर गांवकरी आपापसांत वर्गणी करून वरील खर्च भागवितात. ह्याप्रमाणे वहिवाट वर्षानुवर्ष चालू आहे. गांवाकडे आधिपत्य आहे अशाच यात्रांची संख्या फार असल्यामुळे, आणि गांवकऱ्यांच्या पाहुणचाराबद्दल त्यांना परस्थांपेक्षा दुकानदार ढळत्या भावाने माल देत नसल्यामुळे, पुष्कळ गांवांना पोकळ मोठेपणाशिवाय दुसरा तादृश फायदा नसून यात्रांमुळे बराच चट्टा मात्र लागतो. पूर्वीच्या स्वस्ताईच्या व बिगर-अबकारी काळांत यात्रांसंबंधानें दाणाचारा उपसून देणे, व तलफा पुरविणे फारसें जाणवलें नाहीं; परंतु आतां तें सर्वांना जड जातें. शिवाय पूर्वी व्यापार संकुचित आणि प्रवास धोक्याचा व अडचणीचा असल्यामुळे यात्रेच्या दुकानदारांप्रीत्यर्थ गांवाला जो खर्च येई त्यांत जागच्या जागी माल मिळाला हा एक फायदाच झाला असे लोकांना वाटे पूर्वी यात्रा म्हणजे कलाकुसरीच्या मालाचे किंवा कलावान लोकांच्या कौशल्याचे प्रदर्शन असे. आता ह्या गोष्टी यात्रांपेक्षा किती तरी व्यवस्थितपणाने फार झाले तर १० - २० कोसांच्या आंतील कसब्यांत किंवा शहरांत पाहण्यास मिळतात. व्यापार वाढल्यामुळे आतां गांवोगांव दुकाने झाली आहेत; आणि सडका, पोलीस वगैरे व्यवस्था झाल्यामुळे वाटेल तेथून माल आणणे कठीण नाही. तेव्हां यात्रेच्या दुकानदारांच्या बोळवणीचे ओझें गांवाने उचलण्याचे कारण आज घटकेला उरले नाही; आणि भिक्षुकी संत-विकलांचे पोट व निशाबाजी चालविणे म्हणजे शुद्ध