पान:गांव-गाडा.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५०      गांव-गाडा.

वळूघोड्यांना घास शेतकरी स्वतः पुरवीत नाहीत, तो ते वाणी व मुसलमान अडत्यांमार्फत विकतात, आणि अडत्यांना विशेष तकलीफ न पडतां शेकडा ४० - ५० अडत मिळते, अशा मतलबाचा पत्रव्यवहार शेतकरी मासिक पुस्तकांत प्रसिद्ध झाला आहे. आठवडाबाजारांत महारजागले, फकीर, गोसावी, बैरागी, वाघे, मुरळ्या, हिजडे वगैरेंची बेहद्द लूट चालते, आणि तिचा मारा कुणबी दुकानदारांवर जबर पडतो. ह्यांशी कटकट घालीत बसावे, तर गर्दी पाहून गिऱ्हाईक दुसरीकडे जातें, आपला माल पडून राहतो, परत घरीं अगर गांवी जाण्याला उशीर होतो, आणि गांवची सोबत निघून जाते; इत्यादि विचार दुकानदारांच्या मनांत येतात. जितका दुकानदार दुर्बल व दिवाभीत तितका त्याला त्रास व तोटा अधिक. बाजारांतल्या दुकानांना प्रशस्त जागा वांटून दिल्या, दोन दुकानांमध्ये जरूर तितकी मोकळी जागा राहिली, आयतखाऊ व आडदांड लोकांवर सक्त नजर ठेवली, आणि हक्क म्हणन बाजार उकळणे महार-जागले व भिकारांना बंद केले, तर थोडक्या काळांत कुणबी दुकानदार बनेल; आणि शेतमालाचे भाव तेजीचे असून ज्या रास्त नफ्याला आज तो आंचवतो तो त्याला मिळेल. आठवडाबाजार व यात्रा भरविण्यासंबंधाने मुंबईसरकाराने सन १८६२ सालचा आक्ट ४ पास केला आहे. त्याअन्वयें नवीन यात्रा किंवा बाजार भरविण्यास जिल्हा मॅजिस्ट्रेची परवानगी लागते. आपल्या सोयीसाठी व व्यापारवृद्धीसाठी लोकांनी आपले जरुरीप्रमाणे नवीन बाजार भरविण्यास हरकत नाही.

 गांवढेकऱ्यांचा बराच बाजार व करमणूक गांवोगांव भरणाऱ्या यात्रांत होते. पावसाळा संपला म्हणजे यात्रांचा हंगाम सुरू होतो. आपल्या गांवीं नवीन बाजार भरविणे झाल्यास, गांवचे लोक वर्गणी जमा करून आसपासच्या सर्व प्रकारच्या दुकानदारांना चिठ्या पाठवितात, आणि त्यांना शिधा, चारा देऊन वर पागोटीही बांधतात. बाजार दर आठवड्यास भरणारा असल्यामुळे दुकानदारांचा पाहुणचार थोडक्याच मुदतींत बंद होतो. पण ही गोष्ट यात्रांना लागू पडत नाही. अमुक एका