पान:गांव-गाडा.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वेतन.      ८१


पाटील-कुळकर्ण्यांकडे असते. पलटणीच्या हालचाली किंवा खेळ होतात त्यावेळी मुक्कामाच्या गांवच्या आसपासच्या गांवांना आगाऊ मागणीप्रमाणे सामानसुमानाची दुकाने तयार ठेवावी लागतात.

 पाटील-कुळकर्ण्यांच्या हल्लीच्या कामाचे वर दिग्दर्शन केले आहे. पूर्वीच्या राजवटीपेक्षां तें पुष्कळ वाढले आहे, आणि सरकारच्या व लोकांच्या गरजा जसजशा वाढतील, तसतसें तें आणखी वाढणार. साधारण मराठी सातव्या इयत्तेच्या आंतील शिक्षणाचे माणसास व्यवस्थितपणे करता येण्यासारखे ते राहिले नाही; आणि त्यांतच शेतांतील पोटहिश्शांची व गांवठाणाची मोजणी व त्यांचे नकाशे काढणे ही कामें गांवकामगारांच्या गळ्यांत अडकविली म्हणजे त्यांच्या शिक्षणाची मर्यादा किती असली पाहिजे ह्याची अटकळ कोणालाही बांधतां येईल. कोणत्याही खात्याला गांवगन्नाची माहिती पाहिजे असली, की ती पाटीलकुळकर्ण्यांना पुरवावी लागते. गांवकऱ्यांशी किंवा काळी-पांढरीशी कोणत्याही खात्याचा संबंध येवो, त्याची कारवाई पाटील-कुळकर्ण्यांना करावी लागते, आणि ते काम पुरे पडण्यासाठी जरूर ती मदत त्यांनाच द्यावी लागते. राज्यव्यवस्था सुधारत चालली तिजबरोबर सरकारची खाती वाढत चालली, आणि प्रत्येकाची चिकित्सा व बारकाईहीं वाढत चालली. त्यामुळे गांवचे दप्तर किती तरी पटीने फुगून त्यांत कीसही पुष्कळ काढावा लागतो. खेड्याखेड्यांनी शाळा झाल्या नाहीत. जेथे झाल्या आहेत, तेथें कुळकर्ण्यांच्या परीक्षेपुरतें सुद्धा ज्ञान मिळविण्याची सोय नसते, आणि अभ्यासासाठी पर ठिकाणी मुलें ठेवण्याची ऐपत फार थोड्या वतनदारांना असते. कर्तुकीचे वतनदार पाटील-कुळकर्णी दुसरीकडे रोजगार पाहतात. कुळकर्ण्यांनी स्वराज्यांत व इंग्रजीत लहान मोठ्या कारकुनी पेशाच्या व खानदानीच्या पाटलांनी लष्करी पेशाच्या नौकऱ्या पतकरल्या व पतकरतात; आणि ज्यांना दुसरीकडे पोट भरण्याची पंचाईत असे वतनदार गांवकीच्या वांट्याला येतात. तेव्हां एकसारख्या नवीन नवीन सुधारणा ज्यांत