शेतकऱ्याला नव्या संशोधनाचे महागडे पेटंट बियाणे विकत घेणे भाग पडेल कारण बाजारात दुसरे काही बियाणे मिळणारच नाही, बियाण्याच्या वाणातून नव्या वर्षाकरिता बियाणे शिल्लक ठेवण्याची बंदी येईल, पेटंट हक्काचा भंग होतो आहे किंवा काय हे बघण्याकरिता गावोगाव बहुराष्ट-ीय कंपन्यांच्या हेरांच्या टोळ्या फिरू लागतील आणि वनस्पतीसृष्टीतील सगळी विविधताच नष्ट होऊन जाईल; शिवाय, या पेटंट हक्कांमुळे भारतातील संशोधन ठप्प होऊन जाईल असे बागुलबुवा शेतकऱ्यांना दाखविण्याचा प्रयत्न होत आहे.
खरे काय ते शेतकरी जाणतो
खरे म्हणजे, या सगळ्या आक्षेपांत काहीही तथ्य नाही. संकरित बियाणी शेतकऱ्यांनी वापरलेली आहेत. त्यांचे फायदे तोटे त्यांना चांगले माहीत आहेत. दुसऱ्या पिढीचे संकरित वाण वापरल्यामुळे पिकाच्या उत्पादनात आणि गुणवत्तेतही फरक पडतो हे त्यांना चांगले ठाऊक आहे. कापसाचा धागा योग्य गुणवत्तेचा हवा असेल तर ४६८ वाणाची फेरलागवड करू नये असे पंजाबराव कृषिविद्यापीठसुद्धा सांगते. त्यात शेतकऱ्याचा फायदा आहे आणि शेतीउद्योगाचा फायदा आहे हे शेतकरी चांगले जाणतो. गुणवत्ता टिकविण्यासाठी अशा शिफारशी मानण्यात त्याला काही अडचण वाटणार नाही. यापुढे जाऊन, दुसऱ्या पिढीचे बियाणे वापरू नये असे बंधन कुणी घातले तर त्यातही शेतकऱ्याला काही मोठी अडचण वाटणार नाही.
वनस्पतीविश्वातील विविधता कमी होणे किंवा संपुष्टात येणे हे एकूण पृथ्वीवरील जीवसृष्टीकरिता धोक्याचे आहे. विविधता टिकविण्याकरिता जे काही प्रयत्न करावयाचे ते सर्व समाजाने केले पाहिजे, शेतीउद्योगावर पोट भरणाऱ्या शेतकऱ्याचीच केवळ, ती जबाबदारी होऊ शकत नाही.
शेतकरी फुकटे नाहीत
परकीय तंत्रज्ञानाची तस्करी करणाऱ्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांना काही लाभ मिळवून दिलेला नाही आणि गेल्या तीस वर्षांत शेतीचा जो विकास झाला, निदान जी उत्पादनवाढ झाली त्याचे श्रेय परदेशी संशोधनाला आणि शास्त्रज्ञांना आहे. परदेशातील अद्ययावत संशोधन भारतीय शेतकऱ्यांना पैसे टाकून वापरायला, तातडीने वापरायला मिळाले तरी त्याचे समाधान आहे. किंबहुना, परदेशी शास्त्रज्ञांच्या कष्टांचा फुकट फायदा घ्यावा ही शेतकऱ्यांची