Jump to content

पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दैनिकं,नियतकालिकांचं वाचनही नियमित होतं. चतुरस्र वाचनामुळे लेखनाची ऊर्मी होणे स्वाभाविक होते.
 सन १९०७ मध्ये सांगली हायस्कूलमध्ये इंग्रजी पहिलीत प्रवेश घेतल्यापासून त्याच्या शालेय प्रगतीत उत्तरोत्तर वाढच होत गेली. शाळेतील शिक्षक श्रीपादशास्त्री देवधर, शंकरशास्त्री केळकर, मुदगल गुरुजी यांचा त्याच्यावर लोभ होता नि वरदहस्तही! मॅट्रिकमध्ये असताना रा. ना. जोशी, गो. वा. केळकर, ब. रा. कुलकर्णी हे त्याचे वर्गमित्र होते. त्या वेळी सांगलीला मॅट्रिकचे केंद्र नसल्याने आपल्या वर्गसोबत्यांबरोबर त्याने बेळगाव केंद्र निवडले. त्याचे चुलत मामा वासूनान त्या वेळी बेळगाव शहापूर संस्थानात होते. ते केंद्र निवडण्याचं हेही एक कारण होतं.
 त्या वेळी शाळा जानेवारीत सुरू होतं. परीक्षांचे निकाल डिसेंबरमध्ये लागत. डिसेंबर १९१३ च्या शेवटच्या आठवड्याला मॅट्रिकचा निकाल लागला. गणेश आत्माराम खांडेकर अहमदाबाद, बेळगाव, मुंबई केंद्रामधून उत्तीर्ण विद्याथ्यार्तं बाराव्या क्रमांकाने अव्वल आला. त्याला ५७५ पैकी ४0३ गुण मिळाले होते. तो मॅट्रिकला जाताच घरच्या मामांनी त्याला परीक्षा होताच पोस्टात चिकटवायची खलबतं सुरू केली असल्याने उच्च शिक्षणाबद्दल इच्छा असूनही तो साशंकच असायचा. पण मोठा भाऊ बळवंत त्याच्यापूर्वी मॅट्रिक होऊन पुण्याच्या फर्गुसन महाविद्यालयात शिकण्यासाठी गेला असल्याने आशा होती. मॅट्रिकचे वर्ष गणशेच्या दृष्टीने धकाधकीचे होते. वडिलांच्या जाण्याने आजोबा, मामांवर सारी भिस्त होती, दुपारचे जेवण देवळात असायचे. आजोबांच्या बदली जेवणाने शाळेला उशीर व्हायचा. रात्री कधी कधी पोह्यावरच निभावायला लागायचं. वडिलांच्या जाण्याने आलेलं पोरकंपण, फाटके कपडे, फी न मिळणं, पुस्तके दुरापास्त. गणेश घरी मदत व्हावी म्हणून संस्कृत गणिताच्या शिकवण्या करायचा. रुपये-आठ आणे मिळकत पण मोठी वाटायचे ते दिवस. अशा दिव्यातून याचं मॅट्रिकला मिळालेलं यश वाखाणण्यासारखं होतं. दुःख विसरायचा एकच उपाय होतावाचन आणि अभ्यास. त्यातून वेळ मिळाला की कृष्णाकाठी जाऊन एकांत संवाद अनुभवायचा.

 निकाल लागला तेव्हा गणशे वासूनानांकडे बेळगावला होता. सागंलीहून वकील झालेल्या चुलत मामा विनुदादाचं पत्र आलं. त्यात फर्गसनला पाठवायची आनंदाची बातमी होती. त्या पत्राने गणेशच्या मनात स्वप्नांची नवी पहाट अनेक मनोरथं घेऊन आली.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/५२