पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असतं. जगभर प्रयोगशील शिक्षणाचं जाळं जुनं आहे. जॉन ड्युईपासून ते तोतोचानपर्यंत अनेक प्रयोग सांगता येतील.
 भारतीय शिक्षणातील मर्यादांचं चांगल भान असल्यामुळे लीलाताईंनी सृजन आनंद शिक्षणाद्वारे शिक्षणात ‘ओअॅसिस' निर्माण करण्याचा प्रयत्न केला. Three 'R', Four 'H' नंतर Five 'E' असं त्यांच्या शिक्षण प्रक्रियेचं, प्रयोगाचं वर्णन करता येईल. Experimental, Evaluative, Educative, Environmental and Excellent! प्रायोगिक शिक्षणाचा पायाच मुळात चौकट तोडण्याचा असतो. आपले पारंपारिक शिक्षण शब्दात अडकलेले आहे, याचं लीलाताईंना पुरेपूर भान आलं नि त्यांनी ते सर्जनात्मक करण्याचे ठरविले. घोडेबाजार केवळ राजकारणात नाही तर शिक्षणातही आहे. स्वातंत्र्याच्या वाटचालीत आपण ‘सब घोडे बारा टक्के' या न्यायानं सार्वत्रिक शिक्षणाचा धडाका लावला. मुलांना शब्द समजले पण त्यांचा अर्थ उमजला नाही. अर्थ न उमजल्याने जीवनात त्याचा उपयोग करता आला नाही. परिणामी शिक्षणाने माणूस बदलण्याचं काम केलं नाही. स्थितीशील शिक्षणातून येणारी प्रगती असमान असते. ती विकासाचा भ्रम तयार करते. क्षमता विकास म्हणजे शिक्षण याचा विसर पडलेल्या शिक्षण व्यवस्थेत स्मरणाला महत्त्व राहून परीक्षा स्मरणशक्तीच्या झाल्या. कौशल्याची कसोटी कधीच लावली गेली नाही. लीलाताईंनी याला छेद देत प्रयोगशीलतेवर भर दिला. प्रत्यक्ष पाहणं, अनुभवणं, प्रश्न विचारणं, उत्तर शोधणं, मुलांना कार्यप्रवण करणं, शिक्षणातील निष्क्रिय श्रवण बंद करणं इत्यादी अनेक मार्गांनी ‘सा विद्या या विमुक्तये' असं बिरूद लाभलेल्या प्रा. श्रीपाद दाभोळकरांच्या प्रयोग परिवार' सारखं शिक्षण प्रयोगशील केलं. मग त्यांनी मुलांची सहल चक्क स्मशानभूमीत नेऊन मृत्यूची अटळता तर समजावलीच पण मृत्यूची भीतीही दूर केली. नवं देतं ते शिक्षण हे ठासवलं.

 शिक्षण म्हणजे सततच्या मूल्यांकनातून घेतलेला क्षमता विकासाचा आढावा. पण ते मूल्यांकन प्रश्नोपनिषदात त्यांनी बांधलं नाही. सृजनाधारे निरीक्षण, परीक्षणातून निष्कर्ष, निर्णयाचे आयोजन व त्यातून जाणीव जागृती असा शिक्षणाचा क्रम असतो हे ओळखून लीलाताईंनी ‘रक्तदानाचा प्रकल्प अंगिकारला. कोवळ्या वयातील मुलं रक्त देऊ शकतात का? येथून सुरू झालेलं प्रश्नांचं काहूर 'दान' म्हणजे काय इथवर नेऊन लीलाताई भिडवतात तेव्हा त्यांचं शिक्षणाचं क्षितिज किती व्यापक, असीम असतं हेच सिद्ध करतं. 'दान' माणसास नादान' बनवतं असं आचार्य विनोबांनीच आपल्या ‘त्याग व दान' या निबंधात स्पष्ट केलंय.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१२१